Monday, 3 February 2014

facebook.comतू आता परत यायला हवीस...

डोळ्यांमध्ये उदंड स्वप्न बाळगत अतिशय महत्त्वाकांक्षा उराशी बाळगत त्या जन्माला येतात. खूप खूप शिकतात. अगदी ठरल्याप्रमाणे यशाची एक एक शिखरं पार करतात. अतिमहत्त्वाकांक्षी लोकांची काही गणितं असतात. त्यानुसारच सगळं झालेलं त्यांना हवं असतं. यात आपली जवळची काही माणसं भरडल्या जातात, त्यांच्या इवल्याइवल्या भावना पायदळी तुडवल्या जातात, याचंही त्यांना भान नसतं....
तीही अशीच एक. लेक्चररशीप, त्यातच पीएच.डी. व्हायलाच हवी आता... त्यातच खूप महागडा फ्लॅट बुक करून ठेवलेला. त्याचं इंटेरियर मनासारखंच व्हायला हवं. त्यामुळे तिकडे रोज एक चक्कर. शेवटी स्वप्नातलं घरही साकार झालेलं. पण त्यात तिला मनभरून राहताही न आलेलं... 
पीए.डी.चं काम तोंडावर आलेलं. घरी यायला उशीर. मुलाची बाराबारा तास भेट नाही. त्याचा स्ट्रेन येऊन त्याची परिणती अखेर स्वतःचा जीव गमावण्यात झालेली. अशा एका (आता नसलेल्या) आईच्या मुलानं तिला लिहिलेलं एक पत्र...
प्रिय (नसलेल्या) आईला,
तू खास माझ्यासाठी तयार करवून घेतलेल्या स्टडीटेबलवर अभ्यास करत बसलो आहे. मॅडमने आईवर एसे लिहून आणायला सांगितला आहे. काय लिहावं सुचत नाही. तू असतीस तर विचारलं असतं. या माझ्या खिडकीतून एक खूप मोठ्ठं झाड मला दिसायचं, पण आता त्यासमोर दोन मोठाल्या इमारती उभ्या होत असल्यानं ते झाड आता दिसेनासं झालेलं, तू जशी दिसेनाशी झाली तसंच. तुझ्यासमोर तुझ्या कामांच्या खूप मोठमोठ्या भिंती उभ्या झाल्या होत्या ना? आज शाळेच्या ट्रीपला गेलो होतो. सगळ्या मुलांनी खूप छान छान पदार्थ आणले होते. एक मित्र म्हणाला, माझी आई तर डबा बनवायला पहाटे चार वाजताच उठून बसली. मी मात्र पिझ्झा आणि बर्गर नेलं. काल बाबांनी फ्रिजमध्ये आणून ठेवलं होतं. तू मागच्या वर्षी ट्रीपला जाताना करून दिलेली पुरी-भाजी आठवली...
तू लावलेल्या शिस्तीप्रमाणे मी शाळेचा टिफीन रोज ओट्यावर नेऊन ठेवतो. कधी त्यात काही उरलेलं असतं. सकाळी घाईच्या वेळी बाई डबा भरताना कुरकुरते, तिला तो घासून घ्यावा लागतो ना म्हणून. मी डबा संपवला की नाही हे तू नेमानं बघायचीच.
एक आबा नानीला भेटायला आले होते. 'तिला (म्हणजे तुला) खूप एक्झर्शन झालं, अभ्यासाचा ताण आला,,,' असं नानी त्यांना म्हणाली. तेव्हा ते आबा म्हणाले, 'सुपरवुमन बनायच्या नादात या मुली काय काय गमावून बसतात. वेळप्रसंगी जीव सुद्धा. याचं त्यांना भान राहिलेलं नाही.' सुपरमॅन माहीत आहे, सुपरवुमन हे कोणतं नवीन कॅरेक्टर आहे कळलं नाही. तुलाही सुपरवुमन बनायचं होतं?
कधी कधी नानी मला पोटाशी घेऊन खूप रडते. 'आपण दोघं सारखे'. असं म्हणते. सारखे कसे? नानीची खूप म्हातारी झालेली आई तर अजूनही जिवंत आहे. ती कमी शिकली म्हणून ती अजूनही जिवंत आहे काय?
एवढ्यातच माझ्या वर्गातल्या मित्राच्या आईच्या गाडीला अॅक्सीडेंट झाला. ती खूप शिकली होती. पण तरीही तिला अजून शिकायचं होतं म्हणून तिनं कॉलेज जॉईन केलं होतं. त्याला शाळेतून घ्यायला उशीर झालाय म्हणून ती घाईनं कॉलेजमधून निघाली, पण त्याच्यापर्यंत पोचलीच नाही... आता तो आणि मी सारखे झालो, हे मात्र नानीला सांगायला पाहिजे.
माझं शार्पनर हरवलं, अशावेळी तुझं ड्रॉवर म्हणजे अलीबाबाची गुहाच. माझी असं काही काही हरवायची सवय तुला माहीत असल्यानं रबर, पेन्सिल, शार्पनर्स एक्स्ट्रा ठेवायची तुझी सवय. इनरजन्सीमध्ये माझी मात्र सोय. तुझं ड्रॉवर उघडलं, त्यात मागच्या वर्षी मी तुला तुझ्या वाढदिवसाला दिलेलं ते छोटंसं टेडी दिसलं. ते तसंच नवीन आहे. किती जपून ठेवलंस ते स्वतःपेक्षाही. तू स्वतःलाही इतकं जपलं असतंस तर...
थंडी आता सुरू झाली आहे. तू सुटकेसमध्ये डांबराच्या गोळ्या घालून ठेवून दिलेली स्वेटर्स काढली. गोळ्या अंगावर उड्या मारत पळून गेल्या. थंडी संपल्यावर त्यांच्यासकट स्वेटर्स परत त्या सुटकेसमध्ये जातील की नाही, याचा त्या गोळ्यांनाही  भरवसा वाटला नसेल का?
समोरच्या फडफडणा-या कॅलेंडरवर या महिन्यातल्या तुझ्या वाढदिवसाची तारीख मला खुणावते आहे. यावर्षी तुला काय द्यावं, हा प्रश्नच सतावत नाही आता. माझ्यासाठी तो प्रश्न शिल्लकच ठेवला नाही तू.
त्या रात्री तू माझ्या केसांमधून खूप वेळ हात फिरवत राहिली. मी निजलो अन् सकाळी उठलो, तर तू नव्हतीसच बाजूला...
'सगळ्या दुःखांवर काळ हेच एक औषध असतं. पडेल विसर त्याला हळूहळू...' असंच काहीतरी परवा कोणी म्हणालं. पण मला तर उलटंच वाटतंय. माणसं गावाला गेली की काही दिवस काही वाटत नाही, नंतर मात्र ती परत यावी असं वाटतं, मलाही आता नेमकं तसंच वाटतंय. तू आता परत यायला हवीस, येतेय ना?

('जगण्यातले काजवे' दै. 'सकाळ' मधील सदरातील एक भाग.)

Sunday, 22 April 2012

एका ‘नकुशी'ची जिदगी


आता स्त्रीभ्रूणहत्या थांबविण्यासाठी कुणी लढा जन्माला आलेल्या त्या मुलीच्या आयुष्याला जन्माला येताच मारुन टाकण्याच्या पलीकडचा हा दर्दनाक प्रकार आहे. तिचा काहीही गुन्हा नसताना सामाजिक विकृतीच्या सुडाचा  द्यायला निघालं आहे. मुलगी नको म्हणून एका आईने नसती औषधं घेतली अन् नसते भोग आलेत. गर्भपात करणे किंवा प्रवास मृदुला करते आहे..


मृदुला डबीर. एक स्त्री. एक चुणचुणीत स्त्री. तिच्यात स्पार्क आहे. पण ती अपंगही आहे. हे अपंगपण नियतीनं लादलेलं असतं तर आपण नाइलाज म्हणून ते स्वीकारत त्याकडे दुर्लक्ष केलं असतं. पण ते मानवी कृतीतून (विकृतीतून म्हणणं जास्त संयुक्तिक) आलेलं असल्यानं ते ठळकपणे मनावर बिबत राहातं अन् मन खट्टू होतं. हे सांगणं एरवी तितकंसं गरजेचं नव्हतं, पण या अपंगपणातूनच तिच्या जिगिविषु वृत्तीचीही ओळख होणारी आहे, यातूनच तिची तीव्र जीवनेच्छा अधोरेखित होणार आहे, अन् यातूनच अपंगपणावर मात करीत मनाला सशक्त ठेवीत कसं जगायचं त्याचे पाठ घालून देणारं तत्त्वज्ञान धडधाकट शरीरांच्या पांगळ्या मनांना मिळणार आहे...

मृदुलाच्या घरी गेले तेव्हा ती भितीला टेकून बसलेली. अगदी मांडी घालून. तिचे सगळे ऋतु असेच जातात. समोर एका चौरंगावर लॅपटॉप. अन् हेच तिचं सध्याचं विरंगुळ्याचं, जगाशी संपर्काचं, सवादाचं साधन. मृदुलाचे हात आणि पाय दोन्हीही अधु आहेत.

तळहात, हाताची बोटं तर अगदी वाकडीच झालेली. ती पांगळीही आहे. इंच इंच सरकत ती घरात फिरत असते. पण तिच्या बोलक्या चेहरयामुळे अन् डोळ्यातल्या विलक्षण चमकीमुळे तिच्या शरीराकडे तसं फारसं लक्षच जात नाही.

कसा विषय काढू? ही दुखावली जाईल काय? हिच्याबद्दल आपल्याला कळलं आहे, मृदुलावर भावाची माया करणारया श्री. अतुल वखरेंनी आपल्याला सांगितलं आहे, अन् मग हिला भेटण्याची आपली इच्छा अधिकच तीव्र झाली आहे. पण तरीही... हिच्या जखमेवरची खपली काढण्याचं पातक आपल्यावर येईल काय? सगळ्याच विषयांवरच्या गप्पा मारून झाल्या. ‘‘मला नं थोड्या थोड्या गोष्टींवरून आत्महत्या करणारयांचा रागच येतो,'' या मृदुलाच्या आतापर्यंतच्या चर्चेमधल्या एका वाक्यानं मात्र मी पारच उडाले. तिच्या जवळपास लोळागोळा असणारया शरीरात वसलेल्या एका सशक्त मनातले ते प्रेरणादायी विचार होते. अपंग मनाच्या दृढांच्या जगण्याला बळकटी देणारे.

मृदुला, तुझ्या या अशा अवस्थेमागचं कारण काय? अगदी जन्मत:च... असं विचारलं अन् मग ती बोलतच राहिली... आता जे वयोवृद्ध आहेत त्यांची पिढी तशी बरयापैकी कन्झव्र्हेटिव्ह विचारांची. मुलगा-मुलगी असा भेद करणारी. आजही या परिस्थितीत तसा फारसा बदल झालेला नाही. बंगरुळूला एका बापाने आपल्या तीन महिन्याच्या तान्हुलीला नाही का सिगारेटचे चटके दिले, मान मुरगाळून मारले अक्षरश:. मृदुलाला आधी बहिणी झाल्या. त्यात हिच्यावेळी आईला दिवस गेले, तेव्हा शेजारी-पाजारी, नातेवाईक यांनी त्यांच्या- म्हणजे मृदुलाच्या आईच्या मनात एक नवंच खूळ घातलं. त्यांना जी लक्षणं दिसताहेत किवा जे डोहाळे लागले आहेत ते तर सगळे मुलगी होण्याचे संकेत देणारेच आहेत, असं त्यांचं म्हणणं. (गर्भजल
परीक्षा रोखता येतल पण या असल्या आंदाजांचे काय?) त्यात मृदुलाची आजी (वडिलांची आई) नातवाचं तोंड पाहायला आसुसलेली.

मृदुलाच्या आईला या सगळ्यांचा प्रचंड ताण आला. आता परत मुलगीच झाली तर... या भयापोटी मग त्यांनी गर्भ पाडून टाकण्यासाठी कुठलंसं होमिओपॅथीचं औषध घेतलं. त्यानं गर्भ तर पडला नाहीच; पण वेगळंच काहीतरी उद्भवलं. तिची अभंग मानसिकता जोपासणारं अपंग शरीर. मुलगी नको या विनाशी मानसकितेची शिक्षा आज मृदुला भोगते आहे, तिचा काहीही दोष नसताना...

मृदुलाचा जन्म झाला तेव्हा तशी ती बरी होती. ती शाळेतही जाऊ लागली, पण ती मोठी व्हायला लागली
तसतशी ती चालताना पडू लागली. तिला शिक्षणाची प्रचंड आवड. खूप शिकायचं अन् खूप मोठं काहीतरी व्हायचं हे तिनं अबोध मनाच्या उराशी कवटाळलेलं स्वप्न. त्यामुळे ती तशाही अवस्थेत शाळेत जाऊ
लागली. पण नंतर नंतर म्हणजे ती पाचवी-सहावीत गेली तसतसं पडण्याचं प्रमाण वाढू लागलं. मग तिच्या हातापायांमधला जोरही कमी होऊ लागला. अन् मग सुरू झाली तिच्या जन्माची चित्तरकथा. मृदुलाचं शिक्षण थांबलं. अंगात प्रचंड ऊर्जा. काहीतरी करण्याची ऊर्मी. ती तिला स्वस्थ बसू देईना. मग ती घरच्याच कपाटातली मिळतील ती पुस्तकं वाचू लागली. त्यात तिच्या हाती तेव्हा आजोबांची काही भविष्यविषयक पुस्तकं हाती आली. मग तिनं त्याचाच अभ्यास केला. समोर असं अधांतरी भविष्य दिसत असल्यानं तिला मग नैराश्यानं ग्रासलं. चिडचिड वाढली. हातात येईल ते फेकावंसं वाटू लागलं. पण मृदुलाचा मूळ गाभाच आनंदी अन् समाधानी असल्यानं तिनं त्या नैराश्यावरही आपल्यापरीने मात केली. दिसेल ते फक्त वाचत सुटणे हेच तिचं ध्येय बनून बसलं.

अशातच तिनं दहावीपर्यंतचं शिक्षण कसंबसं पूर्ण केलं. मृदुलाचं लग्नही झालं, तिला खूप गोड अन्
अत्यंत देखणी मुलगी आहे. प्राची. ती आता बीकॉमला आहे. आपल्या आईचं सारंच ती मायेच्या
ममत्वानं करते. अगदी मृदुलाची आई बनून. वयाच्या एका आंधळ्या वळणावर सळसळत्या भावनांची भूक
भागविण्यासाठी मृदुलाशी त्यानं लग्न केलं. अपंग असलं तरी त्या कोवळ्या वयात तिच्या गोंडस
व्यक्तिमत्त्वाची तहान लागली त्याला, त्यानं त्या तहानेला सामाजिक भान असल्याचा चेहरा दिला...

मृदुलाच्या दुर्दैवी फेरयाचा दुसरा अध्याय म्हणजे तिचं लग्न. मृदुला आई-वडिलांकडे ज्या घरी राहायची
त्याच्या मागे एक दक्षिण भारतीय युवक राहायचा. तो नोकरीला होता रेल्वेमध्ये. एकदा तो नोकरीवर गेला
अन् त्याच्या घराचं मागचं दार उघडंच राहिलं. मृदुलाच्या ही बाब लक्षात आल्यानं तिनं त्या घराचं
आपल्याच घरातून नजर ठेवून दिवसभर राखण केली. ही बाब त्याला कळली अन् तो इम्प्रेस झाला. त्यानं
मग कालांतराने मृदुलाशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखविली. मृदुलाला वास्तवाचं भान असल्याने तिला
या लग्नाला ठाम नकार होता. पण हा युवकही आपल्या निर्णयावर ठाम राहिला. अन् एक दिवस
मृदुला बधली. लग्नाला कशीबशी तयार झाली. या मुलाने संसाराची सुरुवात तर तशी चांगली केली.
वेगळं घर घेतलं. अन् संसाराला सुरुवात झाली. पण काही दिवसांतच त्याचं मन भरताच त्याचा
मृदुलामधला रस हळूहळू कमी होऊ लागला.

अशातच तिला दिवस गेले होते. अन् त्यातच त्या नवरयाच्या तिला देणारया यातनांची इयत्तादेखील
वाढतच चालली होती. मृदुलाने ते नऊ महिने अत्यंत तणावाखाली काढले. आपल्याला होणारं मूलही
आपल्यासारखं अपंग जन्माला आलं तर... या एकाच विचाराने तिला ग्रासलं होतं, तिची झोप उडविली
होती. पण सुदैवाने नियतीने मृदुलाच्या ओच्यात एक सुंदर मुलगी घातली. मृदुलाच्या आत वसलेल्या एका
नितळ मनाची त्या ईश्वरीतत्त्वालासुद्धा कुठेतरी कणव आली असणार. म्हणूनच कदाचित प्राचीच्या जन्माचं
प्रयोजन असणार. तिच्या आईला नकुशी असणारया मृदुलाच्या पोटीही एक हवीहवीशी वाटणारी लेक
जन्माला आली.

कालांतराने मृदुलाचा नवरा दुसरयाच एका स्त्रीमध्ये गुंतला, अन् मद्रासला निघून गेला. मृदुलाचा जीवनाशी लढा सुरू झाला. एकटं कसं राहायचं, वडिलांनी जाण्याच्या आधी त्यांचा राहता फ्लॅट मृदुलाच्या नावे करून दिला. पण तोही तिने एकुलता एक असलेल्या आपल्या भावाच्या नावाने करून टाकला. पण जग हे उगवत्या सूर्यासमोर नतमस्तक होणारं असतं. त्याला सख्खे अन् रक्ताचे देखील अपवाद ठरत नाहीतच. समोर येणारया अनवट वाटा पार करीत कुठे कुठे फरफटत मृदुला आता एका दोन खोल्यांच्या घरात राहते. नवरा पोटगीदाखल जी रक्कम पाठवतो त्यात तिला भागवावं लागतं. त्यात नक्कीच भागत नसावं. प्राची आईला फुलासारखं जपते. तिचं सगळं लहान बाळासारखं करते. पोएटिक जस्टीस...

मृदुलाच्या नवरयानं दुसरं लग्न केलं पण त्याला मुलबाळं झालं नाही. आता तो गोंडस प्राचीला म्हणतो, तू माझ्याकडे ये. या माझ्या बायकोला आई म्हण. तू राजकन्याच आहेस माझी... प्राची बिकॉम फस्र्ट इयरला असलेली पण तिने बापाला ठाम नकार दिला. आईला सोडून येणार नाही अन् आईचं सौभाग्य हिसकावणारीला आई म्हणनार नाही. सुखात लोळण्यासाठी ऐनवेळी पाठ फिरविणारया बापाची राजकन्या होण्याऐवजी तिने संघर्ष करत झाशीची राणी होणे पत्करले... आजच्या पिढीत आयुष्याची समजच नाही, असे किमान प्राचीकडे पाहून तरी म्हणता येत नाही.

दरम्यान मृदुला श्री श्री रवीशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग प्रकल्पाला जोडली गेली आहे. मृदुला
अतिशय टेक्नोसॅव्ही आहे. ती लॅपटॉप त्यातील इंटरनेट लीलया हाताळते. बोलताना अनेक इंग्रजी
शब्दांचा अस्खलित वापर करते. नेटवरून मेल्सद्वारा बाह्यजगाच्या संपर्कात असते. तिची वृत्ती तडफदार
असल्याने अन् मेंदू तल्लख असल्याने तिला हे सगळं चांगलं जमतंदेखील. माझं हे अपंगपण, माझी ही
कमजोरीच माझं बलस्थान ठरलं आहे, हे तिचं आणखीन अंतर्मुख करणारं बोलणं.
एक मन चांगलं असलं की मग अशा व्यक्तींना सगळंच चांगलं मिळत जातं. मृदुलालाही असंच एक
टवटवीत मन लाभलं आहे. नव्हे ते तसं तिनं घडवलं आहे. नियतीसकट तिची कुणाचबद्दल तक्रार नाही.
त्यामुळेच तिचा जनसंपर्कही दांडगा आहे. अन् मृदुलाची खरी पुंजी म्हणजे तिनं जमवलेली हीच चार
चांगली माणसं. तिच्या छोट्याशा घरात सतत ये जा असते. सतत राबता असतो. आर्ट ऑफ लिव्हिंगचे
स्नेही येतात. त्यात अतुल वखरेंसारखे मग तिचे भाऊ बनून जातात, आपल्या घरची भाजी आणताना
तिच्याही घरी भाजी भरली जावी याची काळजी वाहतात, प्राचीचा मामा बनून तिची अगदी आस्थेवाईकपणे विचारपूस केली जाते...

मृदुलाचं आता एकच मागणं आहे. तिला घरबसल्या काहीतरी करू शकेल असं रोजगाराचं साधन हवं आहे. ज्यातून ती तिच्या गरजा भागवू शकेल. मृदुलाच्या हिमतीला तोड नाही. ज्यांच्या पायाशी सगळी सुखं लोळण घेतात, तरीही जी माणसं कुरकुरत असतात, आपल्याच आयुष्याला कोसत असतात अशांनी मृदुलाच्या घरी एकदातरी नक्कीच जावं, तिच्याशी मनमुराद बोलावं जादूची कांडी फिरावी तसं तुमच्या मनातलं मळभ क्षणात दूर करण्याची ताकद मृदुलाच्या शब्दांमध्ये आहे. तिच्या बोलण्यात निराशा नाही, भोगून गेलेल्या यातनामय प्रवासाचे कढ नाही, की जीवनाला कोसणे नाही.

आहे तो फक्त आशावाद अन् तो तिच्या देहबोलीतून अन् शब्दाशब्दांमधून झळकत असतो. ज्या जीवनाने
तिला दगा दिला त्या जीवनाची किमत तिला कळली आहे, तिच्या वाट्याला आलेल्या यातनांनीच
तिच्यासमोर ओशाळल्यागत व्हावे तिच्यासमोर नतमस्तक होत तिला शरण जावे एवढा अधिकार
तिनं आता निश्चितच मिळवला आहे...

Wednesday, 18 May 2011

'इंडिया' जिंकला भारताचे काय?

रबर अगदी तुटेपर्यंत ताणून सोडून दिल्यावर अचंब्यालाही अवचित वाटेल इतकी ऊसळी घेईल, अशी ती रात्र उसळलेली होती. जिंकणार का आपण? या प्रश्‍नाचे उत्तर टाकल्या जाणाऱ्या प्रत्येक चेंडूला मागण्यात येत होते. अखेर जिंकलो! अवघा इंडिया रस्त्यावर उतरला होता. अकरा, बारा, साडेबारा... आता मात्र तिच्या आईचा जीव तुटायला लागला होता. आता येऊन जायला हवं होतं ना... येईलना गं, हे कुटुंबातील इतरांचं समजावणं देखील आता पोकळ झालं होतं.

""ममा, मी अरोराकडे मॅच बघायला जाणार आहे. आम्ही सगळेच जमणार आहोत...'' तिनं सांगितलं होतं. आईनं मात्र परवानगीच मागतेय पोर या अर्थानं चार सूचना केल्या. अरोरा म्हणजे कुणी मैत्रीणच असेल, हा देखील आईचा आपल्याच पातळीवरचा विश्‍वास. बरं लेकीचं सांगणं हे "ममा'ला, आईला नव्हे. मॅच संपली. आपण (?) जिंकलो. आनंदही साजरा करून झाला. आता एक वाजत आलाय. मोबाईलची बेल जातेय, पण ती काही उचलत नाही. आईला मग परवा पाकिस्तान विरुद्ध मॅच जिंकल्यावर धरमपेठेत उत्साहानं दिराच्या गाडीत बघायला गेल्यावर तरुणाईनं केलेला विकृत उन्माद आठवला. त्यांचा उधाणलेला जल्लोश. त्यात आपण काय करतो आहोत, याचा बहुतांशांना विसर पडलेला. विश्‍वकप जिंकताक्षणी चौकांमध्ये अमर्याद गतीत बाईक्‍सचे रेसिंग, शॅंपेन फोडणे, अन्‌ या सर्वांवर ताण आणि सगळ्यात अश्‍लाघ्य प्रकार म्हणजे आजूबाजूच्या युवतींकडे बघून किंवा या पराक्रमी युवकांचे प्रताप कौतुकाने पाहण्यासाठी जमलेल्या बायाबापड्यांकडे पाहून या युवकांच्या तोंडून निघणाऱ्या अवार्च्य कॉमेंट्‌स. आईला आता काळजी वाटू लागली. इतरांनी आता खूप रात्र झालीय म्हणून सकाळी येईल म्हणत घरातले दिवे मालवले. तरणी लेक अपरात्री बाहेर असल्यावर घरातले दिवे मालविले गेले तरी आईचे डोळे मात्र मिटत नसतात.

किती वाजलेत माहिती नाही. दूरवर अजूनही ताशे वाजत असल्याचा क्षीण आवाज. आधी असे भजनाचे सूर यायचे कानावर यावेळी... फाटकाला कुणाचीतरी गाडी जोरात धडकल्याच्या आवाजानं त्यांचा वाडाच जागा होतो. माजलेत पोरं, चषक जिंकल्याचा दारुडा आनंद कसचा? असं म्हणत सगळे तावातावानं खाली गेलेले. खाली ती गाडीसह फाटकाजवळ पडलेली. तरीही तोंडानं, ""जित गया इंडिया, जित गया ना साला!'' अशी बडबड चाललीय. आईला कळत नाही. ती जीवाच्या आकांतानं विचारते, ""काय झालं गं? बरं नाही वाटत का? अहो चक्कर आलीय वाटतं पोरीला...'' शेजाऱ्याला कळलेलं पोरीला कसली चक्कर आलीय ती. मग ते बाहेर तमाशा नको म्हणून तिला आत नेतात. ""दारू प्यायलीस तू?''

""नाय, रम, रम... दारू नाही रम. जित गया इंडिया! पाकिस्तानको... , श्रीलंका की... '' तिची अर्वाच्य बडबड.
- मुलीच्या जातीला शोभतं का हे?
- मुलीच्याच कशाला मुलांनाही शोभत नाही.
- हा कसला आनंद?
- आता नुसती दारूच प्यायली की... हो नशेत कशाचं राहातं भान?

दुसऱ्या दिवशीची सकाळ- आई तिला घरातल्या देवघराजवळ ओढत नेऊन माफी मागायला आणि परत असं होणार नाही, अशी शपथ घ्यायला लावते. ती पण ""हंगामा क्‍यू बरपां?'' अशा बेफिकीर अविर्भावात, ""बोलली ना ममा मी, नाही ना होणार असलं. इंडिया काय
वारंवार जिंकतो का? 28 वर्षांनंतर जिंकला ना...''

इंडिया जिंकला तर ती कुणीतरी मॉडेलबया विवस्त्र होणार म्हणे. सामान्य घरची तरूणाई शरीराचं जाऊ द्या पण मनानं नागडी झाली. इंडियाच्या जिंकण्याची असली झिंग असेल तर नकोच जिंकायला!

इंग्रज निघून गेले. जाताना या देशाचे दोन नव्हे तर तीन तुकडे केलेत त्यांनी. पाकिस्तानचा एक अन्‌ भारत आणि इंडिया हे दोन. इंडिया विरुद्ध भारत हे सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक या सगळ्या स्वरूपातलं युद्ध कायमचं धुमसत ठेवूनच ते गेले. त्यापाठोपाठ आलेला भौतिकवादही आमच्या इंद्रियांना खुणावू लागला, अन्‌ सुखावूही लागला. गगनचुंबी इमारतींमधला, मॉल्समधला टेक्‍नोसॅव्ही इंडिया भारताला अधिकाधिक केविलवाणं करीत सुटला आहे.

दोन दिवसांनी तीच पोर ओळखूच येत नव्हती. नववार, नाकात नथ, कपाळावर कुंकवाची चंद्रकोर, गळ्यात पुतळीमाळा... आई देखील तिचं हे रूप निवलेल्या डोळ्यांनी साठवून घेते आहे. घरापासून थोडी दूर आल्यावर ती मोबाईलचा आयपॉड कानाला लावते. कुठलंतरी ढिकच्याकऽऽ गाणं वाजतंय हे तिच्या बॉडीलॅंग्वेजवरून स्पष्टच दिसतंय. आता ती पाडवा "सेलीब्रेट' करायला निघाली आहे. कदाचित अरोराच्या घरीच!

आनंद साजरा करताना तो लाऊडलीच साजरा व्हायला हवा, प्रत्येकच आनंदाला सेलिब्रेशनचं गोंडस नाव देताना डीजेच्या तालावरच पावलं थिरकायला हवीत, संदल लावूनच नाचायला हवं- मग ते सण असोत, घरगुती समारंभ असो. मॅच जिंकण्याचा आनंद असो. पाडव्याच्या त्या पहाटेला देखील परवाची ती झिंगलेली रात्र सरलेलीच नाही, हे दिसत होतं. इंडिया जिंकल्याचा उन्माद तिच्या डोळ्यात अजूनही अन्‌ भारत नेहमीच का हरतो ही सल माझ्या डोळ्यात!

माणसांचं प्रेम अन्‌ प्रेमाचे गाव...!

आपण माणूस या नात्याने माणसांच्या प्रदेशात राहतो. अवतीभवती सगळीकडे तशी माणसांचीच गर्दी असते. आता माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपला जास्तीत जास्त वावर मानवसमूहातच राहणार. कधी आपण याच माणसांसोबत अगदी निरुपाय म्हणून वावरतो, कधी अपरिहार्यता असते. तर कधी काही माणसं जीवनात उत्कट रंग भरणारीही असतात. सरसकट सगळीच चांगली किंवा सगळीच वाईट अशी माणसं नसतातच मुळी. आपल्या तात्कालिक समजुतींनुसार आपण त्या त्या वेळी त्या त्या माणसाला चांगलेपण अथवा वाईटपण बहाल करीत असतो. अर्थात हे सारेच आपला लाभ किंवा हानी याच निकषांवर ठरते. माणूस एकमेकांसाठी जीव देतात आणि प्रसंगी घेतात देखील.
 
वळणावळणांवर माणसांचे काफिले भेटत राहतात. अवचित एखादा माणूस आयुष्याचा तो क्षण उजळवून टाकायचं सामर्थ्य बाळगून असतो. आपलं तत्क्षणीचं आयुष्य गर्भरेशमी करण्यास, वळणच वळणदार करून टाकणारी ही माणसं काळजाचा गाभारा करून टाकतात.
 
शांताबाई शेळकेंच्या ओळी अशावेळी हमखास आठवून जातात-
कधी रुजलेली असतात ही नावरूप नसलेली नाती?
कसे फुटतात त्यांना अचानक कोवळे संदर्भ?
आणि जीवनाच्या रख्ख कोरड्या विस्तारातही
कसे झुलू लागते एक आपलेपण निरपेक्ष, अर्थगर्भ?
म्हणूनच असं आयुष्याचं वेडंवाकडं वळण वळणदार करून टाकणारी माणसं जपली पाहिजेत. त्यांचं मनातलं वास्तव्य अवघं जीवन प्रासादिक करण्याला पुरेसं असतं. आयुष्याशी झगडायला बळ देणारं असतं. तसं तर अगदीच नकोशी वाटणारी माणसं प्रत्येकाच्या आयुष्यात चारदोनच येत असावीत. पण काही जणांच्या दुःखाला तेवढंच भांडवल पुरेसं असतं. एरवी माणसांना माणसांची तशी ऍलर्जी असू नये. माणसं वाचता आली, की ती हळूहळू कळू लागतात. उमजू लागतात. माणूस वाचण्याचं साक्षरपण यावं लागतं, हे खरं. 

त्या विस्तीर्ण मैदानातल्या गोल ट्रॅकवर एक जोडपं फिरायला आलेलं. वातावरण तसं रम्य. उंच उंच झाडांमधून जाणारा तो ट्रॅक. संध्यामग्न झाडं एकमेकांना बिलगून काही तरी गूज सांगत असलेली. अन्‌ मावळतीच्या सूर्याला उद्याच्या भेटीचं आश्‍वासन मागणारी. पण त्या जोडप्यामध्ये अखंड निंदा चाललेल्या. अर्थात माणसांच्याच. झाडा- जनावरांच्या निंदा करण्याइतकी माणसं अद्याप मोठीच झालेली नाहीत. शेजार-पाजार-आप्त-स्वकीय. माणसांचे प्रेमाचे, निंदेचे, असूयेचे सगळे विषय माणसांपासून सुरू होतात अन्‌ माणसांपाशीच संपतात. फुलांची निंदा करता येत नाही अन्‌ फुले माणसांची तेवढी दखलही घेत नाहीत.
 
एकुणात काय तर चर्चेत येणारी सगळी माणसंच. माणूस म्हणून माणसांच्याही वरची पातळी गाठून माणसं निरखता येऊ नये का? काहीजणांसाठी माणसं परिस्थितीसापेक्ष असतात. म्हणून ती अनुनय आणि असूयेतच हेलकावे खात असतात.
 
एकदा एका गावात भल्या पहाटेच एक यात्रेकरू येऊन पोचला. गावाबाहेर वेशीपाशी एक म्हातारा बसला होता. या नवख्या यात्रेकरूने म्हाताऱ्याला विचारले, "या गावातली लोक कसे आहेत? मी आपले गाव सोडले आहे आणि मला या गावात थांबायचे आहे.'' त्या वृद्धाने क्षणभर त्याच्याकडे पाहिले अन्‌ तो म्हणाला, "तू जे गाव सोडले त्या गावातली माणसं कशी होती?'' हा प्रश्‍न ऐकताच त्या यात्रेकरूच्या डोळ्यात संताप आणि तिरस्कार तरारला. "त्यांची आठवणही माझ्यासमोर काढू नका. इतके दुष्ट लोक या जगात नसतील. त्यांच्यामुळेच तर मला ते गाव सोडावे लागले.'' त्यावर तो वृद्ध म्हणाला, ""मग मला निराश वाटतंय, कारण या गावातली माणसंही त्या गावातल्या माणसांहून काही फारशी वेगळी नाहीत. या गावातही तसेच दुष्ट लोक आहेत.'' तो प्रवासी निघून गेल्यानंतर दुसरा एक प्रवासी आला. त्यांच्यातही तोच संवाद झडला. "तू सोडलेल्या गावातील लोक कसे होते?'' यावर क्षणात त्याचे डोळे प्रेमाश्रूंनी भरून आले. तो म्हणाला, "आमच्या गावातल्या इतके चांगले लोक मी कुठेच बघितले नाहीत. पण नाईलाजास्तव मला गाव सोडावे लागत आहे.'' त्यावर तो वृद्ध त्याला म्हणाला, "मग तू मोठ्या खुशीने ये. मी तुझं स्वागत करतो. या गावातले लोक तुला तिथल्यापेक्षा अधिक चांगले वाटतील. इथंही फार चांगले लोक राहतात. याच नव्हे, तू कुठल्याही गावात जा. तुला प्रेमळच माणसे भेटतील.''

शहरात निर्धारित गतीनं धावत राहिलात तर तुम्हाला ग्रीन सिग्नलच मिळत राहतो. तसंच प्रेमाच्या गावाहून निघालात की कुठलंही गाव तुम्हाला प्रेमळ माणसांचंच मिळत राहातं. अखेर गाव म्हणजे घरांचा समूह नव्हेच. नाहीतर हरप्पा मोहेंजोदारो "गावांचे अवशेष' म्हटले गेले असते. तिथेही आपण माणसांच्याच खुणा शोधतो. गाव एकमेकांच्या ओढीनं बांधल्या गेलेल्या माणसांचाच समूह असतो. माणसं प्रेमळ असली की मग गावही प्रेमाचा होत असतो...