Wednesday, 10 December 2014




मैत्रीण (दिवाळी अंक 2008)

(डॉ. मंदा आणि डॉ. प्रकाश आमटे यांची घेतलेली मुलाखत)

-भाग्यश्री पेठकर

मंदाकिनीच्या तटावरून...


शहरी वातावरणात, सुखवस्तू घरात वाढलेल्या डॉ. मंदा देशपांडे या तरुणीने डॉ. प्रकाश आमटेंच्या साथीने एक असिधाराव्रत स्वीकारलं. ज्या आदिवासींचा भाषाही कळत नव्हती, ज्यांना कधी बधितलंही नव्हतं, त्यांच्यामध्ये राहून त्यांच्या उत्थानासाठी कार्य करायचं ठरवलं. पण हा स्वप्नांचा मखमली मार्ग नव्हता. कशा चालल्या असतील त्या या मार्गावरून? आज मॅरसेसे पुरस्काराने सन्मानित झालेल्या या तपस्विनीची ही कहाणी, तिच्याच शब्दात...

कुण्या प्रेमिकांच्या भेटीला इतका मोठा सामाजिक कार्यकारणभाव असू शकतो का? सदतीस वर्षांपूर्वी ती दोघं एकमेकांना भेटली... त्यांची ती भेट गुलजार नव्हती. आवड होती, घट्ट निवड गोती, वचनेही होती पण ते सारेच असामान्य होते. तेव्हा त्यांच्या त्या भेटीच्या क्षणांच्या उदरात क्रांतीची बीजं रुजली होती... प्रियकर-प्रेयसीच्या भेटीत समाजासाठी आयुष्य वेचून टाकण्याच्या कांतिकारी शपथा!
त्यांची गाठभेट घालून देण्यात नियतीचं खास असं प्रयोजन दडलेलं होतं. एका ध्येयवेड्या विचाराने त्यांना झपाटलं  अन् त्याला कृतीची जोड देत त्यांनी एक संकल्प सोडला... विदर्भातल्या भामरागड परिसरातल्या, अतिशय दुर्गम भागातल्या आदिवासींच्या उत्थानाचा. अतिशय खडतर आणि तितक्याच अवघड कार्याचा वसा त्या दोघांनी घेतला. तो वसा ती दोघं आजही तितक्याच इमानेइतबारे चालवीत आहेत, त्या कर्मयोगी जोडप्याचं नाव आहे मंदा आमटे आणि प्रकाश आमटे!
डॉ. प्रकाश आमटेंच्या वाट्याला बाबा आमटेंसारख्या दैवदुर्लभ महामेरूचा घरंदाज वारसाच होता. प्रकाश आमटेंचं ते संचित होतं, म्हटलं तर वारसाहक्काने चालून आलेली जबाबदारीच होती... मंदाताईंचं काय? एका सर्वसामान्य, धार्मिक, कर्मठ कुळात जन्माला आलेल्या मंदा देशपांडे नामक तरुणीनं, प्रेमात पडल्यावर दिसते मजला सुखचित्र नवे म्हणत उद्याच्या मांडलेल्या संसाराची गंधसोनेरी चित्रे रंगविली असती, तर ते काही चुकीचं ठरलं नसतं. तेही एमबीबीएस सारखं, पुढच्या, सर्वार्थानं संपन्न आयुष्याचा मार्ग प्रशस्त करणा-या उच्चशिक्षणात, सहाध्यायी असलेला सखा भेटल्यावर... गुबगुबीत बंगल्यात राहणा-या अशा अनेक यशस्वी डॉक्टरी जोड्या आपण पाहतोच की... वसंताला शब्द देण्याच्या वयात प्रकाश आमटेंनी आपला शब्द आदिवासींच्या सेवेला देऊन टाकला होता. मंदाताईंनी देखील हे पातिव्रत्य स्वीकारण्याचं वचन दिलं...
त्यांच्या प्रेमाने भामरागड परिसरातल्या आदिवासींना माणसासारखं जगण्याचा दिलासा दिला... पण त्यासाठी मंदा देशपांडे-आमटे नामक त्या तरुण विवाहितेला, सख्याच्या हाती फुलं देऊन काट्यांचा मार्ग स्वेच्छेने स्वीकारावा लागला. म्हणून परवा मॅगेसेसे घेऊन परतल्यावर नागपूर जवळच्या अशोकवनात या जोडप्याचं दर्शन घेतलं... मंदाताईंशी बोलणंही झालं. काळाजी कॅसेट रिव्हर्स झाली. आदिवासींचं जीवन समृद्ध करणारा मंदिकिनी चा हा प्रवाह कसा, कुठून आला, त्याने कशी वळणं घेतली... सारेच कळो आले!
मी काशीला गंगा पाहिली. शांत, स्थिर, प्रासादिक, गंभीर अन् खोलही... मंदाताईंना भेटल्यावर तोच भाव मनात दाटून आला. त्यांचा चेहरा कमालीचा आर्द्र- स्नेहाळ आहे. ममत्वानं भारलेल्या कर्तृत्वाचा शांतभाव त्यांच्या चेह-यावर पसरलेला असतो. आपल्या देशात अलीकडे फक्त देवांच्या मूर्तीच इतक्या शांत पाहता आल्या आहेत. मंदाताईंसमोर बसल्यावर काहीही न बोलकाच बरेच काही कळून जाते. असामान्य होण्यासाठी आधी सामान्य व्हावं लागतं. त्यांनी अजूनही त्यांच्यातलं सामान्यत्व जपलेलं आहे. जिनं जंगल म्हणजे सहलीसाठी गेल्यावरच पाहिलेलं आहे, ती मंदा लग्न करते अन् मधुचंद्रासाठी हेमलकसाला जाते... शब्दशः चंद्रमौळी झोपडीतच. दारही नाही, खिडक्याही नाहीत...
जरा त्यांची सुरुवात बघू. काय आहे की आजच्या मंदाताई पाहिल्यावर, ऊंSS त्यांनी हे करावं त्यात काय एवढं? असं कुणी म्हणू शकतं. (उंच हिमालय असं कसं म्हणायचं?) म्हणूनच या गंगेची सुरुवात बघू...
नागपुरातील श्री. वसंतराव व कुसुमावती देशपांडे यांची डॉ. मंदाताई ही कन्या. शिकून सवरून एक सर्वसामान्य जीवन जगण्याचे संस्कार बाळगून असलेलं त्यांचं सत्शील घराणं. मंदाताईंनी शालेय शिक्षण पूर्ण करून डॉक्टर होण्यासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे त्यांची श्री. प्रकाश आमटेंशी ओळख झाली. ओळखही शस्त्रक्रियागृहात... पुढे या जोडप्याला समाजातील विकृतींवर शस्त्रक्रिया करून, न्यून ते काढून टाकायचे असल्याचे नियतीला माहिती होते.. ओळख मैत्रीत अन् मैत्री प्रेमात रूपांतरित झाली. आपल्यासाठी हाच जोडीदार योग्य आहे, असा दोघांच्याही मनांनी कौल दिला. अन् एका महत्कार्याचे सूतोवाच झाले... बाबा आमटेंबद्दल मंदाताईंना माहीत होतेच. त्यांच्या पुत्राच्याच प्रेमात पडल्यावर त्यात बाबांविषयी अन् त्यांच्या कार्याविषयी जाणिवेचाही प्रकाश पडला.
मंदाताई बाबा आमटेंच्या कामाने प्रभावित होत्याच. त्यातच प्रकाश आमटेंनी त्यांना, लग्नानंतर आदिवासींच्या उत्कर्षासाठी तुला माझी सोबत करण्याची तयारी असेल, तरच आपली ही सहजीवनाची स्वप्नं सत्यात उतरतील, असं सुचवल्यानंतर, मंदाताईंनी मम म्हणत आयुष्यातल्या अतिशय महत्त्वाच्या निर्णयाचा श्रीगणेशा केला.
तिथून त्यांच्या खाचखळग्यांनी भरलेल्या खडतर प्रवासाला सुरुवात झाली. पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट बाजूला सारून चटणी भाकरीला प्राधान्य देणं, तसं सर्वसामान्यांच्या आवाक्यापलीकडलंच. डॉक्टर होऊन शहरात स्थायिक होत, एक छानसं सुरक्षित असं कौटुंबिक जीवन व्यतीत करावं, असं कुणाला नाही वाटत? तेच मंदाताईंना वाटलं नसेल? पण या सगळ्यांवर मात करीत त्यांनी डॉ. प्रकाश आमटेंसोबत एका अग्निदिव्यात उडी घेतली. त्यात या दाम्पत्याचे पाय पोळले, (असं आपल्याला उगाच वाटतं, त्यांना नाही!) पण त्यातून आदिवासींच्या वाटेवर फुलांच्या पायघड्या अंथरल्या गेल्या. अन् त्यांच्या आयुष्यात सुगंध दरवळू लागला...
1971 मध्ये मंदाताईंचं डॉ. प्रकाश यांच्याशी लग्न झालं. मानवी आयुष्याला मुकलेल्या आदिवासींसाठी काहीतरी करायला हवं, या विचाराने बाबांना पछाडलं होतं. डॉ. विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे यांच्यावर आनंदवनाची जबाबदारी असल्याने ते काम बाबांनी डॉ. प्रकाश यांच्यावर सोपवलं होतं. आदिवासींसाठी कंबर कसलेल्या या जोडप्याला त्यांनी आशीर्वाद दिले आणि 1972 मध्ये, हेमलकसा येथे आदिवासींना हळूहळू डोळे किलकिले करून जगाकडे पाहण्याचं सामर्थ्य मिळू लागलं. नागपूरपासून सुमारे 400 किलोमीटर अंतरावरील गडचिरोली या मागास आणि दुर्गम जिल्ह्यातील भामरागड, हेमलकसा येथे डॉ. मंदा, डॉ. प्रकाश, त्यांची मानलेली बहीण रेणुका आणि इतर स्वयंसेवकांसोबत तेथे एक झोपडी बांधली आणि आपल्या कामाचा झेंडा रोवत किचकट अशा कार्याला सुरुवात झाली. सभोवताली घनदाट जंगल... कुठलं संकट आलं, तर दूरदूरपर्यंत आपलं असं हाकेला कुणीच नाही... प्राणांची बाजी लावूनच या लोकांनी या होमकुंडात उडी घेतली होती!
पहिले काही दिवस तर तेथील अर्थनग्नावस्थेत असलेले माडिया, गोंड आदिवासी, या मंडळींना पाहून पळून जात. त्यांचा विश्वास संपादन करण्यात बराच कालावधी द्यावा लागला.
मंत्र-तंत्र, भूतप्रेत, करणी, भानामती, आदींवर विश्वास ठेवणा-या आदिवासी स्त्रिया आणि एकूणच जमात यांच्यात आरोग्याबद्दल जी अंधश्रद्धा परसली आहे, ती दूर करण्याचं महत्त्वाचं काम मंदाताईंनी हाती घेतलं. त्यासाठी भाषेचा अडथळा येऊ लागला. काही दिवसांत आदिवासींची माडिया भाषा शिकावी लागली. माडिया- मराठी असा शब्दकोशच मग या लोकांनी तयार केला. या मंडळींची अथक आणि प्रामाणिक कळकळ पाहून तेथील आदिवासींना हे आपले रक्षणकर्ते आहेत, असा विश्वास निर्माण झाला. एकदा एक तरुण रुग्ण, यांनी थाटलेल्या झोपडीतल्या रुग्णालयात आला. त्याला फिट्स यायच्या. डॉ. मंदा आणि डॉ. प्रकाश यांच्या अथक प्रयत्नांनी या तरुणाची प्रकृती हळूहळू सुधारू लागली, त्यानंतर मग हळूहळू तेथील आदिवासी बांधव उपचार करून घेण्यासाठी पुढे धजावू लागले...
आजचे हेमलकसा वेगळे, भौतिक सुखसोयींना चटावलेले आपण, सामान्यपणे अजूनही तिथे दोन दिवसांच्या वर राहू शकणार नाही. तिथे या बाईनं अवघं आयुष्य काढलं. हेमलकसा येथे 1992 पर्यंत वीज नव्हती आणि 2001 पर्यंत दूरभाष नव्हते. एवढंच काय, पण पिण्यायोग्य पाणीदेखील मिळत नसे. साप, विंचू तसेच वाघ, अस्वलं या हिंस्त्र प्राण्यांचं सर्वत्र मुक्त साम्राज्य. हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्याने जखमी झालेले आदिवासीच त्यांच्याकडे रुग्ण म्हणून जास्त प्रमाणात यायचे. रुग्ण आले  की पुस्तकं वाचून वाचून त्यांच्यावर उपचार व्हायचे. अन् रुग्णाला आराम पडला या दाम्पत्याचे चेहरे आनंदाने आणि समाधानाने उजळून जायचे. मलेरिया, टीबी, डायरिया, कफ, गँगरिन, अल्सर यांचं या भागात थैमान. तशातच कुपोषणही. आमटे यांच्या या प्रकल्पाला सरकारने हेमलकसा भागात 50 एकर जागा उपलब्ध करून दिली. तेथे या दोघांनी लोकबिरादरी हॉस्पिटल उभारले. आज या रुग्णालयात दरवर्षी 40 हजार रुग्णांवर मोफत इलाज केले जातात. तेथे रुग्णांसाठी 50 खाटांची व्यवस्था आहे. दोन अद्ययावत ऑपरेशन थिएटर्स आहेत. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेपासून ते फ्रॅक्चरपर्यंतचे सगळे इलाज आज तेथे विनामूल्य उपलब्ध आहेत.
हेमलकसा परिसरातली एक गर्भवती महिला एकदा त्यांच्या झोपडीवजा रुग्णालयात आली. तिचे दिवस भरले होते. पण प्रसूति अतिशय क्लिष्ट होऊन बसली होती. त्यात बाळ व आई दोघांचेही प्राण जाण्याची शक्यता होती. प्रकाश व मंदा यांनी त्या महिलेला तपासलं आणि बाळाचा जीव गमवावा लागला तरी त्या महिलेचा जीव वाचविण्याची शाश्वती दिली. सुरुवातीला ती तयार होईना. मग तिची समजूत काढता काढता या लोकांची पुरेवाट झाली. त्यावेळी शल्यक्रियेला लागतात ती कुठलीच अद्ययावत सामग्री त्यांच्याजवळ उपलब्ध नव्हती. होती ती केवळ एक प्रामाणिक कळकळ. त्या आदिवासींप्रती असलेल्या कळकळीतूनच त्यांना वेळोवेळी धैर्य मिळत गेलं. त्याप्रमाणे त्या महिलेचे तिथेच सिझेरियन झाले. बाळ दगावलं. पण माता सुरक्षित राहिली. काही वर्षांनी हीच स्त्री पुन्हा गर्भवती राहिली आणि प्रसूतिसाठी मंदा-प्रकाश यांच्याकडे दाखल झाली. तिची नॉर्मल प्रसूचि होऊन मुलगी झाली. तिचं बिरादरी असं नामकरण करण्यात आलं, हे मंदाताईंकडून प्रत्यक्ष ऐकून घेताना अंगावर रोमांच उभे राहत होते. पावसाळा आला, की हेमलकसा आणि परिसराला दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या इंद्रावती, बांडिया नदीच्या पुराचा वेढा जुलैपासून असायचा. त्यामुळे या प्रदेशाचा जवळपास सहा महिनेपर्यंत जगाशी संपर्क तुटलेला असायचा. त्यासाठी आधीच सहा महिन्यांची बेगमी करून ठेवावी लागायची. कणकेत अळ्या व्हायच्या. त्यामुळे त्यानंतरचं भोजन म्हणजे मुगाचं वरण आणि एकदा, दोनदा, तीनदा केवळ भातच भात. फळं, हिरव्या भाज्या डोळ्यांनी दिसत नसत. तेव्हा साधनाताई आनंदवनहून कितीतरी किलोमीटर लांब, आपल्या या मुला-नातवंडांसाठी पायपीट करीत ते जिन्नस घेऊन यायच्या.
आदिवासी क्षेत्रात काम करताना सुरुवातील मंदाताईंना अनेक क्लिष्ट अशा समस्यांना तोंड द्यावं लागलं. त्यात एकाकीपणाची समस्या अधिक तीव्र होती. वाचन नाही. कुठलं मनोरंजन नाही. कौटुंबिक जीवन नाही. कुठल्या नातेवाईकांशी संबंध नाही, त्यांचा काही हालहवाल नाही... आणि सुरुवातीला आदिवासींचं सहकार्यदेखील नाही. अशाही परिस्थितीत न डगमगता खंबीरपणे उभी राहणारी ही माणसे कुठल्या मातीची बनली असतील, असा प्रश्न साहजिकच मनात उमटून जातोच.
मंदाताईंच्या हेमलकसामधील झोपडीत छपराला दो-या लटकाव्यात तसे साप लटकलेले असायचे. अन् पायाखाली विंचूंचं साम्राज्य!
कसे जगलात तुम्ही? मनातला प्रश्न बाहेर पडलाच. त्यांच्याशी मैत्री केली. कारण त्यांच्या इलाक्यात आम्ही अतिक्रमण केलं होतं. मंदाताई स्निग्ध हसत उत्तरल्या.
कितीही काही म्हटलं तरी किमान स्वतःसाठी हसावं तर वाटतं की नाही? छोट्या छोट्याच पण असंख्य इच्छा असतात. मंदाताईंना चित्रकलेची आवड होती. चित्र छान काढायच्या त्या. आदिवासींच्या जीवनाचं चित्र बदलताना कॅनव्हासवर चित्र उतरवायचं राहूनच गेलं. काही गोष्टींना पैसे लागत नाहीत फार, पण त्यातच खरा आनंद असतो. आता निवांत संध्याकाळी नव-यासोबत रम चहा घेत गप्पा मारायला फार काही लागत नाही. त्यानं आणलेल्या आण्याच्या गज-यातही मन हरखून जातं बाईचं... किमान कधी अगदीच लगटून नाही, तर हातात हात घालून फिरायला तरी पहाटेला...
सोबतच्या कार्यकर्त्यांना वेगळेपण वाटू नये म्हणून... त्या एवढंच म्हणतात. आयसोलेशनचा प्रॉब्लेम आला अर्थात त्यांच्या या सांगण्यात विषाद अजिबातच नव्हता.
मंदा-प्रकाश यांना पहिला मुलगा झाला, दिगंत. नागपूरहून ही शुभवार्ता प्रकाश यांच्यापर्यंत गडचिरोली जिल्ह्यातल्या दुर्गम भागात पोहोचायलाच काही महिन्यांचा कालावधी लागला. नंतर अनिकेत झाला, तेव्हाही तेच हाल. मुलं कशी वाढली असतील त्या वातावरणा?  पुन्हा मनातल्या प्रश्नांनी उसळी मारलीच. आदिवासींच्या मुलांसोबतच वाढली, खेळली, शिकली. दरम्यान या मंडळींनी त्या भागात एक निवासी शाळा काढली होती. तिथं आदिवासी मुलं-मुली शिकायला यायची. त्यातच ही मुलं शिकली. एकच क्षण स्वतःला विचारून घ्यायचं, आपण आपल्या मुलांना अशा शाळेत घालू शकतो? त्यांचीही मुलं याच शाळेत असल्याने सुरुवातीला आदिवासींची एक-दोन मुलंच असायची नंतर मात्र संख्या वाढत गेली.
या सगळ्या जगावेगळ्या प्रवासात मंदाताई किंवा डॉ. प्रकाश यांच्यावर उद्विग्नतेचे, असहाय्यतेचे क्षण आलेच नसतील असं मुळीच नाही. तीही शेवटी माणसंच आहेत. दिगंत लहान होता. त्याला एकदा सेरेब्रल मलेरिया झाला. ताप उतरेना. पुस्तकं वाचून वाचून त्याच्यावर या धैर्यवान माय-बापाने इसाल केले. पण त्यानंतर त्याला फिट्स यायला सुरुवात झाली. तेव्हा मात्र पहिल्यांदा या खंबीर, धाडसी मातेच्या डोळ्यात अश्रू तरळले. तेव्हा वाटून गेलं आपण शहरात असतो, तर आपल्या मुलाला ताबडतोब वैद्यकीय मदत मिळाली असती.. पण हे विचार काही क्षणांपुरतेच. त्यांच्या झपाटलेपणापुढे या दुबळं करणा-या विचारांचा फार काळ टिकाव लागला नाही. कारण हे कार्य आपण स्वतःहून स्वीकारलं आहे, कुणीही त्यासाठी आपल्याला भरीस पाडलेलं नाही हे स्वतःलाच पटवीत डॉ. मंदा आमटे पुन्हा नव्या जोमाने कामाला लागल्या. अन् एवढंच पुरेसं नव्हतं म्हणून की काय, एक आदिवासी अनाथ मुलागी दत्तक घेतली. ती आरती!
मंदाताईंना आदिवासींबद्दल प्रचंड जिव्हाळा आहे. धड खायला-प्यायला मिळत नसलेल्या या कुपोषित पट्ट्यात एकही भिकारी नाही, हे वास्तव एकून कुणालाही आश्चर्याचा धक्काच बसेल. तिथे चो-या होत नाहीत. या आदिवासींवर जंगलातले अस्वलादी हिंस्त्र प्राणी हल्ला करतात तेव्हा त्यांना अक्षरशः शंभर किंवा त्यावरही टाके घालावे लागतात. तेही भूल न देता घातले जातात पण त्यांच्या तोंडून हूं की चूं निघत नाही. त्या मानाने आपण फारच दुबळे आहोत, हेही मंदाताईंकडूनच कळलं. म्हणूनच मग मंदाताईंना हृदयविकाराचा एकदा हलकासा त्रास झाला. नागपूरला आणले. त्यातला तज्ज्ञ वगैरे डॉक्टर नव्हता. सलाईन लावले होते. ते संपले. नर्सचे लक्ष नव्हते. तिची वाट न बघता यांनी सलाईन बंद केले. काढून टाकले.
 डॉक्टर म्हणाले, आराम करा.
इथे कसला आराम? म्हणत ताई हेमलकस्याकडे निघाल्याही... ख-या अर्थाने मोठी माणसं स्वतःबद्दल बोलताना गप्प असतात. ती संकोचतात. त्या अर्थाने त्यांनी स्ववर विजयच मिळवलेला असतो. मग त्यांना जाणून घ्यायचं असेल तर त्यांच्या आप्तांकडूनच.
सौ. विजयाताई शेवाळकर अगदी लेकीच्या मायेनं मंदाताईंबद्दल बोलतात. काय म्हणाली मंदा? ती स्वतःबद्दल जास्त बोलत नाही. मंदाबद्दल ऐकायचं असेल तर साधनाताईंकडून ऐक बाई... त्यांच्याचकडून तुला खरी मंदा कळेल. तिचं कौतुक करताना साधनाताईंना शब्द अपुरे पडतील अशी टिप्पणी देखील त्या करतात... असं कुणीतरी एखाद्या व्यक्तीबद्दल अगदी उत्स्फूर्तपणे, निस्पृहपणे बोलून गेलं, कीच ती व्यक्ती सर्वार्थाने मोठी आहे असं समजावं.
दीनांच्या, उपेक्षितांच्या वाटेवर प्रकाश आणि विकासाचे पर्व आले. आदिवासींच्या जीवनाचे खोरे समृद्ध करीत मंदाकिनी धावली.
आता कर्मयोगी आमटे परिवाराचा वसा पुढे चालवायला त्यांची तिसरी पिढी तितच्याच उत्साहाने पुढे सरसावली आहे. मंदाताई व डॉ. प्रकाश यांचा मुलगा दिगंत हा सर्जन आहे. तोही हेमलकसा येथेच आदिवासींच्या सेवेत मग्न आहे. दिगंतची अर्धांगिनी अनघा ही देखील गायनॉकॉलॉजिस्ट आहे. ती खरे तर गोव्याची आहे. पण ती देखील हेमलकसाच्या लोकबिरादरी हॉस्पिटलमध्ये सेवारत आहे. मंदाताईंचा नातू चि. अर्णव तिथेच खेळतो बागडतो. पण आता परिस्थितीत आश्चर्यकारक सुधारणा आहे. आदिवासी त्यांच्या शिक्षणाप्रति, आरोग्याप्रति जागरूक झाला आहे. त्यामागे अर्थातच डॉ. मंदा व डॉ. प्रकाश आमटे त्यांचे कुटुंबीय तसेच सहकारी यांचे अथक परिश्रम दडलेले आहेत. त्यांच्या आयुष्याच्या समिधांची आहुती, त्यांनी या होमात अर्पण केली. म्हणूनच आज हा तेजोदिवस बघण्याचा योग अखिल समाजाला लाभला आहे.
डॉ. मंदा आणि डॉ. प्रकाश आमटे यांना नुकतेच अतिशय प्रतिष्ठेच्या मॅगॅसेसे पुरस्काराने सन्मानिक करण्यात आले आहे. याआधीही त्यांना आदिवासी सेवा पुरस्कार, सावित्रीपाई पुरस्कार, हेडगे पुरस्कार, नागभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. असे निस्पृह कार्य करणा-यांना कुठल्या पावतीची कधी गरज पडत नसते. त्यामुळे त्यांना पुरस्कारांचा हपाप नसतो. पुरस्कारच यांच्यासाठी बनलेले असतात आणि त्या पुरस्कारांचीच प्रतिष्ठा यांच्यामुळे वाढत असते.
मंदाताईंच्या स्निग्ध, निर्व्याज चेह-यावर आज समाधान आहे, ते आजच्या घडीला आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात उन्नत झाल्याचे! आणि तोच त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार आहे.

- फेमिना या मासिकानं मंदाताईंवर नाईटिंगेल या शीर्षकांतर्गत लेख लिहिला होता. त्यात त्यांना नाईटिंगेल ही उपाधी दिली गेली होती.

- हेमलकसा आदी भागातील आदिवासींना मीठ पाहायला मिळत नव्हते. मीठ आणि भात हे त्यांचं मुख्य अन्न. मंदाताई आणि प्रकाश आमटेंनी जेव्हा आदिवासींसाठी कार्य करण्याची प्रतिज्ञा घेतली तेव्हा या उभयतांनी आदिवासींचं आयुष्यच आत्मसात केलं. ही दोघं आणि यांच्यासोबतची इतर मंडळी पावसाळ्यात जेव्हा संपर्क तुटायचा तेव्हा सहा महिने फक्त भात खाऊन राहायची. इतकंच नाही, तर स्वतःच्या मुलांनाही त्यांना त्याच सवयी लावल्या. त्यांची मुलंही आदिवासींसोबत नुसता मीठ-भात खायची, आदिवासींसाठी मंदा-प्रकाशची एवढी समर्पित वृत्ती अनुभवल्यानंतर एकदा बाबा म्हणाले होते, मला पुढचा जन्म मंदा-प्रकाशच्या पोटी मिळावा. 

-मध्ये एकदा डॉ. प्रकाश आमटेंना एका दुःसाध्य रोगाने ग्रासलं होतं. त्याची तपासणी झाल्यानंतर डॉक्टरांनी, हेमलकसाचं वातावरण आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत असल्यानं ते गाव सोडण्याचा सल्ला त्यांना दिला. पण प्रकाश-मंदा यांनी तितक्याच निग्रहानं सांगितलं, आम्ही केवळ आमच्या आरोग्याचा विचार करणार नाही. हेमलसकातील बाकीच्यांच्या आरोग्याचं काय, ती लोकं तर पिढ्यान्पिढ्या तिथं आपलं जीवन कंठत आहेत. माझ्या एकट्याचं स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी आम्ही दोघंही कदापि गाव सोडणार नाही. आपल्या नर-याच्या इच्छेचा प्रतिवाद मंदाताईंनी कधीच केला नाही. त्याही प्रकाशभैयांच्या निर्णयात उत्साहात सामील झाल्या. त्यांच्या प्रत्येक कार्यात मंदाताईंचा सिंहाचा वाटा होता. 

- मा. प्रा. राम शेवाळकर अगदी सहदभावाने सांगून जातात, पूर्वीच्या ऋषींच्या आश्रमात जसं दृष्य असायचं तसं दृष्य हेमलकसाला पाहायला मिळतं. निसर्गाशी अगदी घट्ट नातं असलेलं. अखिल सजिवांवर सारखंच प्रेम करणारं, भेदभावरहित. चि. मंदा आणि चि. प्रकाश ही दोघं वयानं लहान असली, तरी ती दोघं ऋषीतुल्यच आहेत. हे सांगताना राम शेवाळकरांना कंठ दाटून येतो. त्यांचे डोळे या उभयतांप्रतिच्या स्नेहाने भरून येतात...


Friday, 7 November 2014

ऊर्मी

मनात
खळ्ळकन् निखळतं काहीतरी
कुणाच्या तरी प्रतिचे
भावनांचे, संवेदनांचे
जपून ठेवलेले अवशेष असतात ते...

काही पडलेले असतात तसेच
अनेक दिवसपर्यंत
मनाच्या पृष्ठभागावर
काही उचलले जातात
सावकाश, फुरसतीनं
काही काही अवशेष
उचलण्याची मात्र घाई होते
कारण
मनाला ऊर्मी बहाल करणारे
जादुगार असतात ते...

-भाग्यश्री पेठकर

(महाराष्ट्र टाईम्स दिवाळी अंक 2014 विदर्भ आवृत्तीत प्रकाशित)

Monday, 13 October 2014

जगण्यातले काजवे / भाग्यश्री पेठकर हर जर्रा चमकता है...



जगण्यातले काजवे / भाग्यश्री पेठकर

हर जर्रा चमकता है...


वीन वर्षाचा पहिला दिवस. काही योजना, काही संकल्प. हा पहिला दिवस हसत घालवावा, म्हणजे मग आपण वर्षभर हसत राहतो, वगैरे वगैरे. मग चल आज आपण मिळून कुठं तरी जाऊ या... म्हणजे असं वर्षभर सोबत सोबत राहणं होईल.म्हणता म्हणता राहिले याला.
शनिवार, तसा अर्धा सुटीचा दिवस अन् पूर्ण सुटीच्या आदला दिवस. माणसं दगदगीच्या गर्दीत हरवलेली. तसलीच सवय झालेली. त्यामुळे सुटीच्या निवांत दिवशी देखील लगबगीच्या दिवसांची सोय करण्याच्या गडबडीत असतात. आम्ही संध्याकाळचं फिरायला निघालो ते भाजी आणायला.
पूर्वी जून झालेल्या कपड्यांच्या पिशव्या शिवण्याची एकॉनॉमी केली जायची. आता कपडेफाड महागाईने पिशव्यांचं कामच ठेवलेलं नाही. त्यात मोबाईलनं एकांतपण गहाण टाकलेलं. घरच्यांना कधीच फ्री टॉकटाईम नसतो. भाजी घेत असतानाच याचा मोबाईल घणघणला. काय म्हणतोस?’ ‘बापरे!’ ‘बस निघालोच...एवढ्या तीन शब्दांत यानं संभाषण संपवलं अन् आम्ही भाजी घेण्याचं टाकून इस्पितळाकडे धावलो... याच्या मित्राच्या बायकोला मॅसिव्ह हार्टअटॅक आला होता. गाडीला कीक मारली. अन् याच्या मोबाईलवर दुसरा मॅसेज. ती गेली... दवाखान्यात जस्ट वन क्लीकवर झालेली एसएमएसी गर्दी!
अशा ठिकाणचे सगळेच चेहरे एका अज्ञात भयानं झाकोळलेले असतात. अन् इथेच जगण्यातल्या कणाकणाचं महत्त्व लक्षात येत असतं.
‘‘मृत्यू म्हणजे आव्हान आहे. वेळ अजिबात वाया घालवू नकाअसं तो सांगतो. एकमेकांशी योग्य तेच वागा, असं तो सांगतो. म्हणून आपण एकमेकांशी प्रेमानं वागतो.’’ - लिओ एफ. बुस्काग्लआचं वाक्य आठवलं.
‘‘उपर बहोत भिड है, आप नही जा सकते।’’ तिथला गार्ड खेकसला. त्याला लिओचं ते वाक्य माहिती असण्याचं काही कारण नसावं.
‘‘अरे पाच मिनीट रे. फक्त भेटायचं अन् यायचं. तू अडवलं अन् आम्ही प्रामाणिकपणे थांबलो म्हणून तू आमच्यावर रंगदारी करतो आहेस. आमच्या मागचे तर कितीतरी निघून गेले.’’
‘‘ठीक है, ठीक है, जल्दी आना।’’ त्याची अरेरावी.
वर असावं तसंच गंभीर वातावरण. जन्माची सोबतीण गमावलेला आमचा तो स्नेही पंखात चोच खुपसून बसलेल्या गारठलेल्या पाखरासारखा चिडीचूप बसला होता. अशावेळी नेमकं काय बोलायचं असतं? खरंतर बोलती बंदच झालेली असते...
उगाच तिथे रेंगाळून आयुष्याचं झालेलं स्मशान चेह-यावर लेवून आम्ही परत जिना उतरू लागलो. एक एक पायरी मोजत खाली येताना जिन्यातल्या प्रत्येक कोप-याकडे लक्ष गेलं. त्या जिन्याच्या प्रत्येक कोप-यावर आरसे बसवलेले. अगदी नवे कोरे! वर चढताना हे कसं लक्षात आलं नाही? मृत्यूचं दडपण होतं. दिसत सगळंच होतं; पण दिसण्याची जाणीव मावळली होती. आता मात्र त्या आरशात आपलाच चेहरा अनोळखी वाटत होता. आपले चेहरे तपासून घेण्यासाठी आरशांचे असे कोपरे केले असतील का? मग आठवलं की मागे इमारतींमध्ये कोपरे घाण करू नयेत म्हणून देवादिकांच्या प्रतिमा लावण्याची शक्कल लढवण्यात आली होती. तरीही असंख्य इमारतींच्या कोप-यात ईश्वर नावाच्या शक्तीला मानणा-यांना त्याच्या प्रति असलेल्या श्रद्धेची थोडीही तमा न बाळगता थुंकण्याचा आपला हक्क बजावलेला पाहिला होता मी. इथे मात्र प्रत्येक कोपरा अगदी आरशांसारखाच लख्ख होता.
क्षणभर आरशात प्रतिमेला न्याहाळलं. काय भाव आहेत सध्या आपल्या चेह-यावर?  खिन्न, उदास की आणखीन काही वेगळे? येणाजाणा-यांचे चेहरे त्या आरशात सांत्वना केल्याचे कर्तव्य बजावल्याने कृतकृत्य झालेले. लोक भेटायास आले काढत्या पायासवे’ ...
ते स्वच्छ कोपरे मात्र अस्वस्थ करून गेले. अगदी ईश्वर, अल्ला, गॉडच्या प्रतिमा लावल्यावरही थुंकणारे मात्र इथे कसे संयत झाले असतील? आरशात आपणच आपल्यावर थुंकणे कुणालाच कसे जमले नाही? अगदी देवांवरही थुंकणा-यांना? ज्याच्या नावावर दंगली करतात त्या देवावरही थुंकतात लोक इमारतींच्या कोप-यात. मग दंगली देवाच्या अस्मितेसाठी नव्हे तर आपल्या अस्तित्त्वासाठी असतात का? माणसाचे या जगात स्वतःवर सगळ्यात जास्त प्रेम असते, हे सत्य पचवून झाले होते मात्र,  इथे एक थरारक साक्षात्कारच झाला,  माणसाचे स्वतःवर केवळ प्रेमच नसते तर त्याची स्वतःवर प्रगाढ श्रद्धा असते. स्वतःवर आणि केवळ स्वतःवरच... बापरे!
मरण म्हणजे पूर्ण सत्य... त्या सत्याचं दर्शन घेऊन येत असताना आणखी एका बोच-या सत्याची अशी भेट झाली. आरशात आपुलीच प्रतिमा वैरी झाली आपलीच! अखेर एवढंच-
हर जर्रा चमकता है, अनवार-ए- इलाही से
हर सांस ये कहतीं है, हम है तो खुदा भी है...





Monday, 3 February 2014

facebook.comतू आता परत यायला हवीस...

डोळ्यांमध्ये उदंड स्वप्न बाळगत अतिशय महत्त्वाकांक्षा उराशी बाळगत त्या जन्माला येतात. खूप खूप शिकतात. अगदी ठरल्याप्रमाणे यशाची एक एक शिखरं पार करतात. अतिमहत्त्वाकांक्षी लोकांची काही गणितं असतात. त्यानुसारच सगळं झालेलं त्यांना हवं असतं. यात आपली जवळची काही माणसं भरडल्या जातात, त्यांच्या इवल्याइवल्या भावना पायदळी तुडवल्या जातात, याचंही त्यांना भान नसतं....
तीही अशीच एक. लेक्चररशीप, त्यातच पीएच.डी. व्हायलाच हवी आता... त्यातच खूप महागडा फ्लॅट बुक करून ठेवलेला. त्याचं इंटेरियर मनासारखंच व्हायला हवं. त्यामुळे तिकडे रोज एक चक्कर. शेवटी स्वप्नातलं घरही साकार झालेलं. पण त्यात तिला मनभरून राहताही न आलेलं... 
पीए.डी.चं काम तोंडावर आलेलं. घरी यायला उशीर. मुलाची बाराबारा तास भेट नाही. त्याचा स्ट्रेन येऊन त्याची परिणती अखेर स्वतःचा जीव गमावण्यात झालेली. अशा एका (आता नसलेल्या) आईच्या मुलानं तिला लिहिलेलं एक पत्र...
प्रिय (नसलेल्या) आईला,
तू खास माझ्यासाठी तयार करवून घेतलेल्या स्टडीटेबलवर अभ्यास करत बसलो आहे. मॅडमने आईवर एसे लिहून आणायला सांगितला आहे. काय लिहावं सुचत नाही. तू असतीस तर विचारलं असतं. या माझ्या खिडकीतून एक खूप मोठ्ठं झाड मला दिसायचं, पण आता त्यासमोर दोन मोठाल्या इमारती उभ्या होत असल्यानं ते झाड आता दिसेनासं झालेलं, तू जशी दिसेनाशी झाली तसंच. तुझ्यासमोर तुझ्या कामांच्या खूप मोठमोठ्या भिंती उभ्या झाल्या होत्या ना? आज शाळेच्या ट्रीपला गेलो होतो. सगळ्या मुलांनी खूप छान छान पदार्थ आणले होते. एक मित्र म्हणाला, माझी आई तर डबा बनवायला पहाटे चार वाजताच उठून बसली. मी मात्र पिझ्झा आणि बर्गर नेलं. काल बाबांनी फ्रिजमध्ये आणून ठेवलं होतं. तू मागच्या वर्षी ट्रीपला जाताना करून दिलेली पुरी-भाजी आठवली...
तू लावलेल्या शिस्तीप्रमाणे मी शाळेचा टिफीन रोज ओट्यावर नेऊन ठेवतो. कधी त्यात काही उरलेलं असतं. सकाळी घाईच्या वेळी बाई डबा भरताना कुरकुरते, तिला तो घासून घ्यावा लागतो ना म्हणून. मी डबा संपवला की नाही हे तू नेमानं बघायचीच.
एक आबा नानीला भेटायला आले होते. 'तिला (म्हणजे तुला) खूप एक्झर्शन झालं, अभ्यासाचा ताण आला,,,' असं नानी त्यांना म्हणाली. तेव्हा ते आबा म्हणाले, 'सुपरवुमन बनायच्या नादात या मुली काय काय गमावून बसतात. वेळप्रसंगी जीव सुद्धा. याचं त्यांना भान राहिलेलं नाही.' सुपरमॅन माहीत आहे, सुपरवुमन हे कोणतं नवीन कॅरेक्टर आहे कळलं नाही. तुलाही सुपरवुमन बनायचं होतं?
कधी कधी नानी मला पोटाशी घेऊन खूप रडते. 'आपण दोघं सारखे'. असं म्हणते. सारखे कसे? नानीची खूप म्हातारी झालेली आई तर अजूनही जिवंत आहे. ती कमी शिकली म्हणून ती अजूनही जिवंत आहे काय?
एवढ्यातच माझ्या वर्गातल्या मित्राच्या आईच्या गाडीला अॅक्सीडेंट झाला. ती खूप शिकली होती. पण तरीही तिला अजून शिकायचं होतं म्हणून तिनं कॉलेज जॉईन केलं होतं. त्याला शाळेतून घ्यायला उशीर झालाय म्हणून ती घाईनं कॉलेजमधून निघाली, पण त्याच्यापर्यंत पोचलीच नाही... आता तो आणि मी सारखे झालो, हे मात्र नानीला सांगायला पाहिजे.
माझं शार्पनर हरवलं, अशावेळी तुझं ड्रॉवर म्हणजे अलीबाबाची गुहाच. माझी असं काही काही हरवायची सवय तुला माहीत असल्यानं रबर, पेन्सिल, शार्पनर्स एक्स्ट्रा ठेवायची तुझी सवय. इनरजन्सीमध्ये माझी मात्र सोय. तुझं ड्रॉवर उघडलं, त्यात मागच्या वर्षी मी तुला तुझ्या वाढदिवसाला दिलेलं ते छोटंसं टेडी दिसलं. ते तसंच नवीन आहे. किती जपून ठेवलंस ते स्वतःपेक्षाही. तू स्वतःलाही इतकं जपलं असतंस तर...
थंडी आता सुरू झाली आहे. तू सुटकेसमध्ये डांबराच्या गोळ्या घालून ठेवून दिलेली स्वेटर्स काढली. गोळ्या अंगावर उड्या मारत पळून गेल्या. थंडी संपल्यावर त्यांच्यासकट स्वेटर्स परत त्या सुटकेसमध्ये जातील की नाही, याचा त्या गोळ्यांनाही  भरवसा वाटला नसेल का?
समोरच्या फडफडणा-या कॅलेंडरवर या महिन्यातल्या तुझ्या वाढदिवसाची तारीख मला खुणावते आहे. यावर्षी तुला काय द्यावं, हा प्रश्नच सतावत नाही आता. माझ्यासाठी तो प्रश्न शिल्लकच ठेवला नाही तू.
त्या रात्री तू माझ्या केसांमधून खूप वेळ हात फिरवत राहिली. मी निजलो अन् सकाळी उठलो, तर तू नव्हतीसच बाजूला...
'सगळ्या दुःखांवर काळ हेच एक औषध असतं. पडेल विसर त्याला हळूहळू...' असंच काहीतरी परवा कोणी म्हणालं. पण मला तर उलटंच वाटतंय. माणसं गावाला गेली की काही दिवस काही वाटत नाही, नंतर मात्र ती परत यावी असं वाटतं, मलाही आता नेमकं तसंच वाटतंय. तू आता परत यायला हवीस, येतेय ना?

('जगण्यातले काजवे' दै. 'सकाळ' मधील सदरातील एक भाग.)

Sunday, 22 April 2012

एका ‘नकुशी'ची जिदगी


आता स्त्रीभ्रूणहत्या थांबविण्यासाठी कुणी लढा जन्माला आलेल्या त्या मुलीच्या आयुष्याला जन्माला येताच मारुन टाकण्याच्या पलीकडचा हा दर्दनाक प्रकार आहे. तिचा काहीही गुन्हा नसताना सामाजिक विकृतीच्या सुडाचा  द्यायला निघालं आहे. मुलगी नको म्हणून एका आईने नसती औषधं घेतली अन् नसते भोग आलेत. गर्भपात करणे किंवा प्रवास मृदुला करते आहे..


मृदुला डबीर. एक स्त्री. एक चुणचुणीत स्त्री. तिच्यात स्पार्क आहे. पण ती अपंगही आहे. हे अपंगपण नियतीनं लादलेलं असतं तर आपण नाइलाज म्हणून ते स्वीकारत त्याकडे दुर्लक्ष केलं असतं. पण ते मानवी कृतीतून (विकृतीतून म्हणणं जास्त संयुक्तिक) आलेलं असल्यानं ते ठळकपणे मनावर बिबत राहातं अन् मन खट्टू होतं. हे सांगणं एरवी तितकंसं गरजेचं नव्हतं, पण या अपंगपणातूनच तिच्या जिगिविषु वृत्तीचीही ओळख होणारी आहे, यातूनच तिची तीव्र जीवनेच्छा अधोरेखित होणार आहे, अन् यातूनच अपंगपणावर मात करीत मनाला सशक्त ठेवीत कसं जगायचं त्याचे पाठ घालून देणारं तत्त्वज्ञान धडधाकट शरीरांच्या पांगळ्या मनांना मिळणार आहे...

मृदुलाच्या घरी गेले तेव्हा ती भितीला टेकून बसलेली. अगदी मांडी घालून. तिचे सगळे ऋतु असेच जातात. समोर एका चौरंगावर लॅपटॉप. अन् हेच तिचं सध्याचं विरंगुळ्याचं, जगाशी संपर्काचं, सवादाचं साधन. मृदुलाचे हात आणि पाय दोन्हीही अधु आहेत.

तळहात, हाताची बोटं तर अगदी वाकडीच झालेली. ती पांगळीही आहे. इंच इंच सरकत ती घरात फिरत असते. पण तिच्या बोलक्या चेहरयामुळे अन् डोळ्यातल्या विलक्षण चमकीमुळे तिच्या शरीराकडे तसं फारसं लक्षच जात नाही.

कसा विषय काढू? ही दुखावली जाईल काय? हिच्याबद्दल आपल्याला कळलं आहे, मृदुलावर भावाची माया करणारया श्री. अतुल वखरेंनी आपल्याला सांगितलं आहे, अन् मग हिला भेटण्याची आपली इच्छा अधिकच तीव्र झाली आहे. पण तरीही... हिच्या जखमेवरची खपली काढण्याचं पातक आपल्यावर येईल काय? सगळ्याच विषयांवरच्या गप्पा मारून झाल्या. ‘‘मला नं थोड्या थोड्या गोष्टींवरून आत्महत्या करणारयांचा रागच येतो,'' या मृदुलाच्या आतापर्यंतच्या चर्चेमधल्या एका वाक्यानं मात्र मी पारच उडाले. तिच्या जवळपास लोळागोळा असणारया शरीरात वसलेल्या एका सशक्त मनातले ते प्रेरणादायी विचार होते. अपंग मनाच्या दृढांच्या जगण्याला बळकटी देणारे.

मृदुला, तुझ्या या अशा अवस्थेमागचं कारण काय? अगदी जन्मत:च... असं विचारलं अन् मग ती बोलतच राहिली... आता जे वयोवृद्ध आहेत त्यांची पिढी तशी बरयापैकी कन्झव्र्हेटिव्ह विचारांची. मुलगा-मुलगी असा भेद करणारी. आजही या परिस्थितीत तसा फारसा बदल झालेला नाही. बंगरुळूला एका बापाने आपल्या तीन महिन्याच्या तान्हुलीला नाही का सिगारेटचे चटके दिले, मान मुरगाळून मारले अक्षरश:. मृदुलाला आधी बहिणी झाल्या. त्यात हिच्यावेळी आईला दिवस गेले, तेव्हा शेजारी-पाजारी, नातेवाईक यांनी त्यांच्या- म्हणजे मृदुलाच्या आईच्या मनात एक नवंच खूळ घातलं. त्यांना जी लक्षणं दिसताहेत किवा जे डोहाळे लागले आहेत ते तर सगळे मुलगी होण्याचे संकेत देणारेच आहेत, असं त्यांचं म्हणणं. (गर्भजल
परीक्षा रोखता येतल पण या असल्या आंदाजांचे काय?) त्यात मृदुलाची आजी (वडिलांची आई) नातवाचं तोंड पाहायला आसुसलेली.

मृदुलाच्या आईला या सगळ्यांचा प्रचंड ताण आला. आता परत मुलगीच झाली तर... या भयापोटी मग त्यांनी गर्भ पाडून टाकण्यासाठी कुठलंसं होमिओपॅथीचं औषध घेतलं. त्यानं गर्भ तर पडला नाहीच; पण वेगळंच काहीतरी उद्भवलं. तिची अभंग मानसिकता जोपासणारं अपंग शरीर. मुलगी नको या विनाशी मानसकितेची शिक्षा आज मृदुला भोगते आहे, तिचा काहीही दोष नसताना...

मृदुलाचा जन्म झाला तेव्हा तशी ती बरी होती. ती शाळेतही जाऊ लागली, पण ती मोठी व्हायला लागली
तसतशी ती चालताना पडू लागली. तिला शिक्षणाची प्रचंड आवड. खूप शिकायचं अन् खूप मोठं काहीतरी व्हायचं हे तिनं अबोध मनाच्या उराशी कवटाळलेलं स्वप्न. त्यामुळे ती तशाही अवस्थेत शाळेत जाऊ
लागली. पण नंतर नंतर म्हणजे ती पाचवी-सहावीत गेली तसतसं पडण्याचं प्रमाण वाढू लागलं. मग तिच्या हातापायांमधला जोरही कमी होऊ लागला. अन् मग सुरू झाली तिच्या जन्माची चित्तरकथा. मृदुलाचं शिक्षण थांबलं. अंगात प्रचंड ऊर्जा. काहीतरी करण्याची ऊर्मी. ती तिला स्वस्थ बसू देईना. मग ती घरच्याच कपाटातली मिळतील ती पुस्तकं वाचू लागली. त्यात तिच्या हाती तेव्हा आजोबांची काही भविष्यविषयक पुस्तकं हाती आली. मग तिनं त्याचाच अभ्यास केला. समोर असं अधांतरी भविष्य दिसत असल्यानं तिला मग नैराश्यानं ग्रासलं. चिडचिड वाढली. हातात येईल ते फेकावंसं वाटू लागलं. पण मृदुलाचा मूळ गाभाच आनंदी अन् समाधानी असल्यानं तिनं त्या नैराश्यावरही आपल्यापरीने मात केली. दिसेल ते फक्त वाचत सुटणे हेच तिचं ध्येय बनून बसलं.

अशातच तिनं दहावीपर्यंतचं शिक्षण कसंबसं पूर्ण केलं. मृदुलाचं लग्नही झालं, तिला खूप गोड अन्
अत्यंत देखणी मुलगी आहे. प्राची. ती आता बीकॉमला आहे. आपल्या आईचं सारंच ती मायेच्या
ममत्वानं करते. अगदी मृदुलाची आई बनून. वयाच्या एका आंधळ्या वळणावर सळसळत्या भावनांची भूक
भागविण्यासाठी मृदुलाशी त्यानं लग्न केलं. अपंग असलं तरी त्या कोवळ्या वयात तिच्या गोंडस
व्यक्तिमत्त्वाची तहान लागली त्याला, त्यानं त्या तहानेला सामाजिक भान असल्याचा चेहरा दिला...

मृदुलाच्या दुर्दैवी फेरयाचा दुसरा अध्याय म्हणजे तिचं लग्न. मृदुला आई-वडिलांकडे ज्या घरी राहायची
त्याच्या मागे एक दक्षिण भारतीय युवक राहायचा. तो नोकरीला होता रेल्वेमध्ये. एकदा तो नोकरीवर गेला
अन् त्याच्या घराचं मागचं दार उघडंच राहिलं. मृदुलाच्या ही बाब लक्षात आल्यानं तिनं त्या घराचं
आपल्याच घरातून नजर ठेवून दिवसभर राखण केली. ही बाब त्याला कळली अन् तो इम्प्रेस झाला. त्यानं
मग कालांतराने मृदुलाशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखविली. मृदुलाला वास्तवाचं भान असल्याने तिला
या लग्नाला ठाम नकार होता. पण हा युवकही आपल्या निर्णयावर ठाम राहिला. अन् एक दिवस
मृदुला बधली. लग्नाला कशीबशी तयार झाली. या मुलाने संसाराची सुरुवात तर तशी चांगली केली.
वेगळं घर घेतलं. अन् संसाराला सुरुवात झाली. पण काही दिवसांतच त्याचं मन भरताच त्याचा
मृदुलामधला रस हळूहळू कमी होऊ लागला.

अशातच तिला दिवस गेले होते. अन् त्यातच त्या नवरयाच्या तिला देणारया यातनांची इयत्तादेखील
वाढतच चालली होती. मृदुलाने ते नऊ महिने अत्यंत तणावाखाली काढले. आपल्याला होणारं मूलही
आपल्यासारखं अपंग जन्माला आलं तर... या एकाच विचाराने तिला ग्रासलं होतं, तिची झोप उडविली
होती. पण सुदैवाने नियतीने मृदुलाच्या ओच्यात एक सुंदर मुलगी घातली. मृदुलाच्या आत वसलेल्या एका
नितळ मनाची त्या ईश्वरीतत्त्वालासुद्धा कुठेतरी कणव आली असणार. म्हणूनच कदाचित प्राचीच्या जन्माचं
प्रयोजन असणार. तिच्या आईला नकुशी असणारया मृदुलाच्या पोटीही एक हवीहवीशी वाटणारी लेक
जन्माला आली.

कालांतराने मृदुलाचा नवरा दुसरयाच एका स्त्रीमध्ये गुंतला, अन् मद्रासला निघून गेला. मृदुलाचा जीवनाशी लढा सुरू झाला. एकटं कसं राहायचं, वडिलांनी जाण्याच्या आधी त्यांचा राहता फ्लॅट मृदुलाच्या नावे करून दिला. पण तोही तिने एकुलता एक असलेल्या आपल्या भावाच्या नावाने करून टाकला. पण जग हे उगवत्या सूर्यासमोर नतमस्तक होणारं असतं. त्याला सख्खे अन् रक्ताचे देखील अपवाद ठरत नाहीतच. समोर येणारया अनवट वाटा पार करीत कुठे कुठे फरफटत मृदुला आता एका दोन खोल्यांच्या घरात राहते. नवरा पोटगीदाखल जी रक्कम पाठवतो त्यात तिला भागवावं लागतं. त्यात नक्कीच भागत नसावं. प्राची आईला फुलासारखं जपते. तिचं सगळं लहान बाळासारखं करते. पोएटिक जस्टीस...

मृदुलाच्या नवरयानं दुसरं लग्न केलं पण त्याला मुलबाळं झालं नाही. आता तो गोंडस प्राचीला म्हणतो, तू माझ्याकडे ये. या माझ्या बायकोला आई म्हण. तू राजकन्याच आहेस माझी... प्राची बिकॉम फस्र्ट इयरला असलेली पण तिने बापाला ठाम नकार दिला. आईला सोडून येणार नाही अन् आईचं सौभाग्य हिसकावणारीला आई म्हणनार नाही. सुखात लोळण्यासाठी ऐनवेळी पाठ फिरविणारया बापाची राजकन्या होण्याऐवजी तिने संघर्ष करत झाशीची राणी होणे पत्करले... आजच्या पिढीत आयुष्याची समजच नाही, असे किमान प्राचीकडे पाहून तरी म्हणता येत नाही.

दरम्यान मृदुला श्री श्री रवीशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग प्रकल्पाला जोडली गेली आहे. मृदुला
अतिशय टेक्नोसॅव्ही आहे. ती लॅपटॉप त्यातील इंटरनेट लीलया हाताळते. बोलताना अनेक इंग्रजी
शब्दांचा अस्खलित वापर करते. नेटवरून मेल्सद्वारा बाह्यजगाच्या संपर्कात असते. तिची वृत्ती तडफदार
असल्याने अन् मेंदू तल्लख असल्याने तिला हे सगळं चांगलं जमतंदेखील. माझं हे अपंगपण, माझी ही
कमजोरीच माझं बलस्थान ठरलं आहे, हे तिचं आणखीन अंतर्मुख करणारं बोलणं.
एक मन चांगलं असलं की मग अशा व्यक्तींना सगळंच चांगलं मिळत जातं. मृदुलालाही असंच एक
टवटवीत मन लाभलं आहे. नव्हे ते तसं तिनं घडवलं आहे. नियतीसकट तिची कुणाचबद्दल तक्रार नाही.
त्यामुळेच तिचा जनसंपर्कही दांडगा आहे. अन् मृदुलाची खरी पुंजी म्हणजे तिनं जमवलेली हीच चार
चांगली माणसं. तिच्या छोट्याशा घरात सतत ये जा असते. सतत राबता असतो. आर्ट ऑफ लिव्हिंगचे
स्नेही येतात. त्यात अतुल वखरेंसारखे मग तिचे भाऊ बनून जातात, आपल्या घरची भाजी आणताना
तिच्याही घरी भाजी भरली जावी याची काळजी वाहतात, प्राचीचा मामा बनून तिची अगदी आस्थेवाईकपणे विचारपूस केली जाते...

मृदुलाचं आता एकच मागणं आहे. तिला घरबसल्या काहीतरी करू शकेल असं रोजगाराचं साधन हवं आहे. ज्यातून ती तिच्या गरजा भागवू शकेल. मृदुलाच्या हिमतीला तोड नाही. ज्यांच्या पायाशी सगळी सुखं लोळण घेतात, तरीही जी माणसं कुरकुरत असतात, आपल्याच आयुष्याला कोसत असतात अशांनी मृदुलाच्या घरी एकदातरी नक्कीच जावं, तिच्याशी मनमुराद बोलावं जादूची कांडी फिरावी तसं तुमच्या मनातलं मळभ क्षणात दूर करण्याची ताकद मृदुलाच्या शब्दांमध्ये आहे. तिच्या बोलण्यात निराशा नाही, भोगून गेलेल्या यातनामय प्रवासाचे कढ नाही, की जीवनाला कोसणे नाही.

आहे तो फक्त आशावाद अन् तो तिच्या देहबोलीतून अन् शब्दाशब्दांमधून झळकत असतो. ज्या जीवनाने
तिला दगा दिला त्या जीवनाची किमत तिला कळली आहे, तिच्या वाट्याला आलेल्या यातनांनीच
तिच्यासमोर ओशाळल्यागत व्हावे तिच्यासमोर नतमस्तक होत तिला शरण जावे एवढा अधिकार
तिनं आता निश्चितच मिळवला आहे...