Wednesday 18 May 2011

'इंडिया' जिंकला भारताचे काय?

रबर अगदी तुटेपर्यंत ताणून सोडून दिल्यावर अचंब्यालाही अवचित वाटेल इतकी ऊसळी घेईल, अशी ती रात्र उसळलेली होती. जिंकणार का आपण? या प्रश्‍नाचे उत्तर टाकल्या जाणाऱ्या प्रत्येक चेंडूला मागण्यात येत होते. अखेर जिंकलो! अवघा इंडिया रस्त्यावर उतरला होता. अकरा, बारा, साडेबारा... आता मात्र तिच्या आईचा जीव तुटायला लागला होता. आता येऊन जायला हवं होतं ना... येईलना गं, हे कुटुंबातील इतरांचं समजावणं देखील आता पोकळ झालं होतं.

""ममा, मी अरोराकडे मॅच बघायला जाणार आहे. आम्ही सगळेच जमणार आहोत...'' तिनं सांगितलं होतं. आईनं मात्र परवानगीच मागतेय पोर या अर्थानं चार सूचना केल्या. अरोरा म्हणजे कुणी मैत्रीणच असेल, हा देखील आईचा आपल्याच पातळीवरचा विश्‍वास. बरं लेकीचं सांगणं हे "ममा'ला, आईला नव्हे. मॅच संपली. आपण (?) जिंकलो. आनंदही साजरा करून झाला. आता एक वाजत आलाय. मोबाईलची बेल जातेय, पण ती काही उचलत नाही. आईला मग परवा पाकिस्तान विरुद्ध मॅच जिंकल्यावर धरमपेठेत उत्साहानं दिराच्या गाडीत बघायला गेल्यावर तरुणाईनं केलेला विकृत उन्माद आठवला. त्यांचा उधाणलेला जल्लोश. त्यात आपण काय करतो आहोत, याचा बहुतांशांना विसर पडलेला. विश्‍वकप जिंकताक्षणी चौकांमध्ये अमर्याद गतीत बाईक्‍सचे रेसिंग, शॅंपेन फोडणे, अन्‌ या सर्वांवर ताण आणि सगळ्यात अश्‍लाघ्य प्रकार म्हणजे आजूबाजूच्या युवतींकडे बघून किंवा या पराक्रमी युवकांचे प्रताप कौतुकाने पाहण्यासाठी जमलेल्या बायाबापड्यांकडे पाहून या युवकांच्या तोंडून निघणाऱ्या अवार्च्य कॉमेंट्‌स. आईला आता काळजी वाटू लागली. इतरांनी आता खूप रात्र झालीय म्हणून सकाळी येईल म्हणत घरातले दिवे मालवले. तरणी लेक अपरात्री बाहेर असल्यावर घरातले दिवे मालविले गेले तरी आईचे डोळे मात्र मिटत नसतात.

किती वाजलेत माहिती नाही. दूरवर अजूनही ताशे वाजत असल्याचा क्षीण आवाज. आधी असे भजनाचे सूर यायचे कानावर यावेळी... फाटकाला कुणाचीतरी गाडी जोरात धडकल्याच्या आवाजानं त्यांचा वाडाच जागा होतो. माजलेत पोरं, चषक जिंकल्याचा दारुडा आनंद कसचा? असं म्हणत सगळे तावातावानं खाली गेलेले. खाली ती गाडीसह फाटकाजवळ पडलेली. तरीही तोंडानं, ""जित गया इंडिया, जित गया ना साला!'' अशी बडबड चाललीय. आईला कळत नाही. ती जीवाच्या आकांतानं विचारते, ""काय झालं गं? बरं नाही वाटत का? अहो चक्कर आलीय वाटतं पोरीला...'' शेजाऱ्याला कळलेलं पोरीला कसली चक्कर आलीय ती. मग ते बाहेर तमाशा नको म्हणून तिला आत नेतात. ""दारू प्यायलीस तू?''

""नाय, रम, रम... दारू नाही रम. जित गया इंडिया! पाकिस्तानको... , श्रीलंका की... '' तिची अर्वाच्य बडबड.
- मुलीच्या जातीला शोभतं का हे?
- मुलीच्याच कशाला मुलांनाही शोभत नाही.
- हा कसला आनंद?
- आता नुसती दारूच प्यायली की... हो नशेत कशाचं राहातं भान?

दुसऱ्या दिवशीची सकाळ- आई तिला घरातल्या देवघराजवळ ओढत नेऊन माफी मागायला आणि परत असं होणार नाही, अशी शपथ घ्यायला लावते. ती पण ""हंगामा क्‍यू बरपां?'' अशा बेफिकीर अविर्भावात, ""बोलली ना ममा मी, नाही ना होणार असलं. इंडिया काय
वारंवार जिंकतो का? 28 वर्षांनंतर जिंकला ना...''

इंडिया जिंकला तर ती कुणीतरी मॉडेलबया विवस्त्र होणार म्हणे. सामान्य घरची तरूणाई शरीराचं जाऊ द्या पण मनानं नागडी झाली. इंडियाच्या जिंकण्याची असली झिंग असेल तर नकोच जिंकायला!

इंग्रज निघून गेले. जाताना या देशाचे दोन नव्हे तर तीन तुकडे केलेत त्यांनी. पाकिस्तानचा एक अन्‌ भारत आणि इंडिया हे दोन. इंडिया विरुद्ध भारत हे सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक या सगळ्या स्वरूपातलं युद्ध कायमचं धुमसत ठेवूनच ते गेले. त्यापाठोपाठ आलेला भौतिकवादही आमच्या इंद्रियांना खुणावू लागला, अन्‌ सुखावूही लागला. गगनचुंबी इमारतींमधला, मॉल्समधला टेक्‍नोसॅव्ही इंडिया भारताला अधिकाधिक केविलवाणं करीत सुटला आहे.

दोन दिवसांनी तीच पोर ओळखूच येत नव्हती. नववार, नाकात नथ, कपाळावर कुंकवाची चंद्रकोर, गळ्यात पुतळीमाळा... आई देखील तिचं हे रूप निवलेल्या डोळ्यांनी साठवून घेते आहे. घरापासून थोडी दूर आल्यावर ती मोबाईलचा आयपॉड कानाला लावते. कुठलंतरी ढिकच्याकऽऽ गाणं वाजतंय हे तिच्या बॉडीलॅंग्वेजवरून स्पष्टच दिसतंय. आता ती पाडवा "सेलीब्रेट' करायला निघाली आहे. कदाचित अरोराच्या घरीच!

आनंद साजरा करताना तो लाऊडलीच साजरा व्हायला हवा, प्रत्येकच आनंदाला सेलिब्रेशनचं गोंडस नाव देताना डीजेच्या तालावरच पावलं थिरकायला हवीत, संदल लावूनच नाचायला हवं- मग ते सण असोत, घरगुती समारंभ असो. मॅच जिंकण्याचा आनंद असो. पाडव्याच्या त्या पहाटेला देखील परवाची ती झिंगलेली रात्र सरलेलीच नाही, हे दिसत होतं. इंडिया जिंकल्याचा उन्माद तिच्या डोळ्यात अजूनही अन्‌ भारत नेहमीच का हरतो ही सल माझ्या डोळ्यात!

माणसांचं प्रेम अन्‌ प्रेमाचे गाव...!

आपण माणूस या नात्याने माणसांच्या प्रदेशात राहतो. अवतीभवती सगळीकडे तशी माणसांचीच गर्दी असते. आता माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपला जास्तीत जास्त वावर मानवसमूहातच राहणार. कधी आपण याच माणसांसोबत अगदी निरुपाय म्हणून वावरतो, कधी अपरिहार्यता असते. तर कधी काही माणसं जीवनात उत्कट रंग भरणारीही असतात. सरसकट सगळीच चांगली किंवा सगळीच वाईट अशी माणसं नसतातच मुळी. आपल्या तात्कालिक समजुतींनुसार आपण त्या त्या वेळी त्या त्या माणसाला चांगलेपण अथवा वाईटपण बहाल करीत असतो. अर्थात हे सारेच आपला लाभ किंवा हानी याच निकषांवर ठरते. माणूस एकमेकांसाठी जीव देतात आणि प्रसंगी घेतात देखील.
 
वळणावळणांवर माणसांचे काफिले भेटत राहतात. अवचित एखादा माणूस आयुष्याचा तो क्षण उजळवून टाकायचं सामर्थ्य बाळगून असतो. आपलं तत्क्षणीचं आयुष्य गर्भरेशमी करण्यास, वळणच वळणदार करून टाकणारी ही माणसं काळजाचा गाभारा करून टाकतात.
 
शांताबाई शेळकेंच्या ओळी अशावेळी हमखास आठवून जातात-
कधी रुजलेली असतात ही नावरूप नसलेली नाती?
कसे फुटतात त्यांना अचानक कोवळे संदर्भ?
आणि जीवनाच्या रख्ख कोरड्या विस्तारातही
कसे झुलू लागते एक आपलेपण निरपेक्ष, अर्थगर्भ?
म्हणूनच असं आयुष्याचं वेडंवाकडं वळण वळणदार करून टाकणारी माणसं जपली पाहिजेत. त्यांचं मनातलं वास्तव्य अवघं जीवन प्रासादिक करण्याला पुरेसं असतं. आयुष्याशी झगडायला बळ देणारं असतं. तसं तर अगदीच नकोशी वाटणारी माणसं प्रत्येकाच्या आयुष्यात चारदोनच येत असावीत. पण काही जणांच्या दुःखाला तेवढंच भांडवल पुरेसं असतं. एरवी माणसांना माणसांची तशी ऍलर्जी असू नये. माणसं वाचता आली, की ती हळूहळू कळू लागतात. उमजू लागतात. माणूस वाचण्याचं साक्षरपण यावं लागतं, हे खरं. 

त्या विस्तीर्ण मैदानातल्या गोल ट्रॅकवर एक जोडपं फिरायला आलेलं. वातावरण तसं रम्य. उंच उंच झाडांमधून जाणारा तो ट्रॅक. संध्यामग्न झाडं एकमेकांना बिलगून काही तरी गूज सांगत असलेली. अन्‌ मावळतीच्या सूर्याला उद्याच्या भेटीचं आश्‍वासन मागणारी. पण त्या जोडप्यामध्ये अखंड निंदा चाललेल्या. अर्थात माणसांच्याच. झाडा- जनावरांच्या निंदा करण्याइतकी माणसं अद्याप मोठीच झालेली नाहीत. शेजार-पाजार-आप्त-स्वकीय. माणसांचे प्रेमाचे, निंदेचे, असूयेचे सगळे विषय माणसांपासून सुरू होतात अन्‌ माणसांपाशीच संपतात. फुलांची निंदा करता येत नाही अन्‌ फुले माणसांची तेवढी दखलही घेत नाहीत.
 
एकुणात काय तर चर्चेत येणारी सगळी माणसंच. माणूस म्हणून माणसांच्याही वरची पातळी गाठून माणसं निरखता येऊ नये का? काहीजणांसाठी माणसं परिस्थितीसापेक्ष असतात. म्हणून ती अनुनय आणि असूयेतच हेलकावे खात असतात.
 
एकदा एका गावात भल्या पहाटेच एक यात्रेकरू येऊन पोचला. गावाबाहेर वेशीपाशी एक म्हातारा बसला होता. या नवख्या यात्रेकरूने म्हाताऱ्याला विचारले, "या गावातली लोक कसे आहेत? मी आपले गाव सोडले आहे आणि मला या गावात थांबायचे आहे.'' त्या वृद्धाने क्षणभर त्याच्याकडे पाहिले अन्‌ तो म्हणाला, "तू जे गाव सोडले त्या गावातली माणसं कशी होती?'' हा प्रश्‍न ऐकताच त्या यात्रेकरूच्या डोळ्यात संताप आणि तिरस्कार तरारला. "त्यांची आठवणही माझ्यासमोर काढू नका. इतके दुष्ट लोक या जगात नसतील. त्यांच्यामुळेच तर मला ते गाव सोडावे लागले.'' त्यावर तो वृद्ध म्हणाला, ""मग मला निराश वाटतंय, कारण या गावातली माणसंही त्या गावातल्या माणसांहून काही फारशी वेगळी नाहीत. या गावातही तसेच दुष्ट लोक आहेत.'' तो प्रवासी निघून गेल्यानंतर दुसरा एक प्रवासी आला. त्यांच्यातही तोच संवाद झडला. "तू सोडलेल्या गावातील लोक कसे होते?'' यावर क्षणात त्याचे डोळे प्रेमाश्रूंनी भरून आले. तो म्हणाला, "आमच्या गावातल्या इतके चांगले लोक मी कुठेच बघितले नाहीत. पण नाईलाजास्तव मला गाव सोडावे लागत आहे.'' त्यावर तो वृद्ध त्याला म्हणाला, "मग तू मोठ्या खुशीने ये. मी तुझं स्वागत करतो. या गावातले लोक तुला तिथल्यापेक्षा अधिक चांगले वाटतील. इथंही फार चांगले लोक राहतात. याच नव्हे, तू कुठल्याही गावात जा. तुला प्रेमळच माणसे भेटतील.''

शहरात निर्धारित गतीनं धावत राहिलात तर तुम्हाला ग्रीन सिग्नलच मिळत राहतो. तसंच प्रेमाच्या गावाहून निघालात की कुठलंही गाव तुम्हाला प्रेमळ माणसांचंच मिळत राहातं. अखेर गाव म्हणजे घरांचा समूह नव्हेच. नाहीतर हरप्पा मोहेंजोदारो "गावांचे अवशेष' म्हटले गेले असते. तिथेही आपण माणसांच्याच खुणा शोधतो. गाव एकमेकांच्या ओढीनं बांधल्या गेलेल्या माणसांचाच समूह असतो. माणसं प्रेमळ असली की मग गावही प्रेमाचा होत असतो...